विकासाचे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीच्या पाठीशी रहा – देवेंद्र फडणवीस
परभणी : परभणी चे जुने खासदार विकासाला विसरले असून आता महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या रूपाने एका सक्षम खासदाराला निवडून द्या. त्यांना दिलेले मत नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महत्वाचे असून ते कर्जरूपाने तुमच्याकडे मत मागत आहेत, 5 वर्षात विकासाच्या व्याजासह ते परत करतील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.1) परभणीत आयोजित जाहीर सभेत दिले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीच्या वतीने आज परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार बबनराव लोणीकर, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.रत्नाकर गुट्टे, आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, राजेश विटेकर, राहुल लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिन देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, रिपाईचे राज्य संघटक डी.एन.दाभाडे आदींची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात देश बदलला असून सर्वप्रथम गरीब कल्याणाचा अजेंडा राबविला आहे. त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळेच मोठे परिवर्तन पहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यातून समृध्दी राष्ट्रीय महामार्गासारखाच शक्तीपीठ मार्ग चालला आहे. या मार्गावर इंडस्ट्रियल हब तयार होणार असून कृषी विज्ञान केंद्र, कृषि विकासाच्या योजना तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात पर्यटन, कृषी समृध्दी व उद्योगांसाठी महत्वाचे योगदान होणार आहे. यानिमित्ताने विकासाची नवीन संधी याठिकाणी पहायला मिळणार मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
