शेवटच्या श्वासापर्यंत माझा संघर्ष सुरू राहणार : प्रा. जोगेंद्र कवाडे
नागपुर : प्रत्येक क्षण शोषित, वंचित व उपेक्षितांसाठी समर्पित करण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात जातीपातीचे राजकारण करून समाजात विश पसरविण्याचे काम महाविकास आघाडी कडून होत आहे. त्यामुळे मानवी मूल्याचे वाटोळे झाले आहे. ही समाज व्यवस्था बदलण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत माझा संघर्ष हा सुरू राहणार, असे प्रतिपादन लॉंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी केले आहे.
सोमवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या केंद्रिय कार्यालयात प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आले. भव्य सत्कार सोहळयात पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या हस्ते प्रा. कवाडे सरांना शॉल व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी प्रतिमा कवाडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविता ताई नारनवरे यांच्यासह विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की, आज महाविकास आघाडीत असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नेहमीच आंबेडकरी चळवळीला खिंडार पाडण्याचे काम केले. या दोन्ही पक्षा मुळेच आम्हाला १६ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्ष करावा लागला त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाची घोषणा करण्यात आली. अवरित संघर्षामुळेच विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर आपल्याला निळा टिळा लावता आला. तो आपल्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण होता. या आंदोलनात माझ्यासोबत भाजपचे गोपीनाथ मुंडे व गंगाधरराव फडणवीस हे देखील तुरुंगात गेले होते. त्यावेळी भाजपाला आंदोलन हे किती महत्त्वाचे आहे याची जाण होती.
परंतु, खंत एव्हढीच की आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचे पक्ष चालविण्याचे ढोंग करणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आजही जातीपातीचे राजकारण करून समुदायाला भरकटविण्याचे काम करीत आहे. भीम सैनिकांचा संघर्ष करण्यासाठीच या दोन्ही पक्षांनी पक्ष व संघटनांना उपेक्षित ठेवण्याचे काम केले. परंतु, आता आंबेडकरवादी जनतेला यांच्या कारभाराची जाण आहे. आगामी निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत येणार आणि यांच्या गढूळ राजकारणाला शमविणार हे नक्कीच असेही प्रा. जोगेंद्र कवाडे सर यावेळी म्हणाले.
