सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पंच दिवसीय राष्ट्रीय पाण्डुलिपी कार्यशाळा’ संपन्न
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकतीच ‘पंच दिवसीय राष्ट्रीय पाण्डुलिपी कार्यशाळा’ संपन्न झाली. सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाचे प्रमुख प्रो. डॉ. कमलकुमार जैन यांच्या मार्फत या कार्यशाळेचे विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी हे कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभले. तसेच डॉ. श्रीनेत्र पाण्डे (Director, International School of Jain Studies, Pune.) हे मुख्य वक्ते म्हणून लाभले. डॉ. श्रीनेत्र पाण्डे यांनी आपल्या बीजभाषणात लेखन कला व पाण्डू लिपी यांच्या प्रारंभाविषयीची माहिती सटीक उदाहरण देऊन सांगितली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भरतेशजी शहा यांनी जैन धर्मामध्ये आलेले कर्म आणि व्रतांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना उद्बोधित केले. यानंतर प्रो. महेश देसाई यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यशाळेमध्ये पाण्डू लिपी (प्राचीन देवनागरी लिपी) शिकवण्यात आली. या कार्यशाळेसाठी श्री. अमितकुमार उपाध्ये, श्री. कृष्णा माळी, प्रो. महेश देसाई शिक्षक म्हणून लाभले. यांनी अतिशय क्रमबद्ध पद्धतीने पाण्डू लिपी विद्यार्थ्यांना शिकवली. काही हस्तलिखित, ताडपत्र यांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. या कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र (पुणे, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, मुंबई इ.) व महाराष्ट्राबाहेरून (दिल्ली, अलिगढ इ.) विद्यार्थी आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तीसहून अधिक विद्यार्थी A+, A श्रेणीने उत्तीर्ण झाले. या ‘पंच दिवसीय राष्ट्रीय हस्तलिखितशास्त्र कार्यशाळे‘च्या समारोप कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (नाशिक) कुलगुरू डॉ. संजीवजी सोनवणे अध्यक्ष म्हणून लाभले. डॉ. संजीवजी सोनवणे यांनी आजच्या नवीन शिक्षण प्रणाली विषयी सांगून सर्व विद्यार्थांना उद्बोधित केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रो. डॉ. विजयजी खरे हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. प्रो. डॉ. विजयजी खरे यांनी विद्यार्थांचे यश ऐकून सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री पंकजजी जैन शहा यांनी आपल्या बीजभाषणातून विद्यार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन केले. वर्धमान एज्युकेशन अँड रिसर्च इस्टिट्युटच्या अध्यक्षा मधुबाला चौरडिया यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुनि श्री अभिजित कुमारजी आणि मुनि श्री जागृत कुमारजी यांनी आपल्या संतवाणीने सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सर्व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचे आयोजन केल्यामुळे डॉ. कमलकुमार जैन यांचे आभार मानले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
‘पंच दिवसीय राष्ट्रीय पाण्डुलिपी कार्यशाळे’ची पूर्ण आर्थिक जबाबदारी श्री भरतेशजी शहा यांनी घेतली. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे संपन्न झाला. सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन श्री भरतेशजी शहा यांचे अत्यंत आभारी आहे. सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन दातारांना विनंती करत आहे की, अध्यासनाला आर्थिक सहाय्य करावे. जेणेकरून प्राकृत भाषा आणि जैन तत्त्वज्ञानासंबंधी अनेक उपक्रम राबवण्यास मदत होईल.
