Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

अखेरीस ६ किमी मेट्रो मार्गाचे ऑनलाईन लोकार्पणहे ही नसे थोडके!- मोहन जोशी

पुणे : अखेरीस रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले आणि पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग तयार होऊनही पुणेकरांच्या वाहतूक त्रासाकडे डोळे झाक करीत याच्या लोकार्पणासाठी पंतप्रधानांना बोलवून मोठा इव्हेंट करण्याचे भाजपाचे मनसुबे होते. मात्र पुणेकरांच्या तीव्र रोषामुळे अखेरीस भाजपाला ऑनलाईन लोकार्पणावरच समाधान मानावे लागले असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हंटले आहे.

मोहन जोशी पुढे म्हणाले की, पुणे शहर कॉंग्रेस पक्ष आणि ‘वेक अप पुणेकर’तर्फे पुणेकरांच्या हितासाठी आवाज उठवून रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पंतप्रधान नाही आले तरी चालतील पण आता सुरु करा अशी आग्रही मागणी करीत राहिले. अखेरीस पुणेकरांचा रोष वाढत आहे हे लक्षात आल्यावर पंतप्रधान न येता आणि मोठा इव्हेंट न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण केले आणि पुणेकरांनी निःश्वास सोडला असे मोहन जोशी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने पुणे मेट्रोची कल्पना सन २००१ मध्ये मांडून पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून सन २०१३मध्ये ती मंजूर करून घेतली. भाजपा राजवटीत २०१५मध्ये पुणे मेट्रोचे भूमी पूजन पंतप्रधानांनी मोठा इव्हेंट करून केले. त्यानंतर ५ ते ६ किमीच्या मेट्रो मार्गांच्या तुकड्यांचे पंतप्रधान उद्घाटन करीत राहिले. संपूर्ण मेट्रो सुरु झाल्यावर उद्घाटन करावे असे न करता दर ५-६ किमी मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इव्हेंट करून तुकड्या-तुकड्यात पुणे मेट्रोची सुरुवात केली. किंबहुना दर ५-६ किमीचा मार्ग पूर्ण झाला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात येऊन लोकार्पण करायचे हा तर पुणेकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनला होता. मात्र ‘टीचभर काम आणि ढीगभर प्रसिद्धी’ हेच धोरण असणाऱ्या भाजपाने पुणे मेट्रोच्या तुकड्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवायचे असे ३ वेळा घडले व पंतप्रधान नरेंद्र मोदी आले देखील!

प्रसिद्धीची हाव असणाऱ्या भाजपाने आता हा इव्हेंट हुकल्यामुळे मेट्रो स्टेशनचे जिने आणि टिकिट विक्रीची खिडकी यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना बोलवूही नये कारण लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी असणार नाहीत. हे वातावरण मात्र साऱ्या देशात आहे याची दखल पुणे भाजपने घ्यावी असे मोहन जोशी यांनी शेवटी म्हंटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading