Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पत्रकार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यावर लाठीमार करणारे पोलीस निरीक्षक पांढरे यांना त्वरित निलंबित करा – माजी आमदार मोहन जोशी

पुणे- शांततेने कार्यक्रम करणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर नाहक लाठीमार करणारे चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी पांढरे यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे आज (शनिवारी) केली.

या शिष्टमंडळात आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, अभय छाजेड, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, रमेश अय्यर, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, चैतन्य पुरंदरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्या पुढाकाराने माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जलकुंभ आशानगर , जनवादी येथे उभारणी केली. पालिकेच्या सभेत उदघाटनाचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. असे असतानाही भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दत्ता बहिरट यांना विश्वासात न घेता, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हाच कार्यक्रम आपला म्हणून घेण्याचे ठरविले.

या प्रकाराचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीने प्रतिकात्मक उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याशी चर्चाही केली. शासनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही कोणीही जाणार नाही, असेही त्यांना सांगितले. तरीही पांढरे यांनी सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बागवे, गजानन थरकुडे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांना धक्काबुक्की केली आणि लाठीमार करण्यात आला. एखाद्या अट्टल गुन्हेगाराला द्यावी तशी वागणूक आम्हाला दिली, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच पुढारी वृत्तपत्र समूहाचे पत्रकार आणि कॅमेरामन यांचा कॅमेरा हिसकावून त्यांना धक्काबुक्की केली, अटक करण्याचा प्रयत्न झाला, पोलीसांच्या या गैरवर्तणुकीचा आम्ही निषेध करीत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकाराची दखल घेऊन चौकशीसाठी समिती नेमत असून त्याचा अहवाल तीन दिवसांत येईल. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

या शिष्टमंडळातउमेश वाघ,प्रवीण डोंगरे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, आयुब पठाण, किशोर मारणे, जयकुमार ठोंबरे, दीपक ओव्हाळ, गोरख पळसकर, ज्योती परदेशी, गणेश शेडगे, फैय्याज अन्सारी, महेंद्र चव्हाण, रवी रजपूत, मंगेश थोरवे, राजू नाणेकर, कान्होजी जेधे, बाबा सय्यद, प्रशांत मिठापल्ली, सचिन बहिरट, नितीन जाधव, शेखर थोपटे, प्रथमेश लभडे, साहिल राऊत, गोरख बाळंदे, राज गेहलोत, साहिल भिंगे, उमेश काची, मंदार लांजेकर, समीर गांधी, युवराज मदगे, हेरॉल्ड मेस्सी, रोहन जाधव, अक्षय पाटील-खांगटे आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading