शारिरीक व्यायाम, मानसिक सक्षमीकरण व अध्यात्म हे यशस्वी जीवनाचे पैलू – पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल
पुणे : स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्राप्रती मोठे योगदान होते. त्यांचे जीवन समजून घेण्याचा संकल्प आजच्या तरुणाईने करायला हवा. प्रत्येकाकडे बुद्धी आणि उर्जा असते, मात्र तिला जागृत करण्याची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती जगाला करुन दिली. शारिरीक व्यायाम, मानसिक सक्षमीकरण व अध्यात्म हे त्यांच्या यशस्वी जीवनाचे पैलू होते, ते आपण अंगिकारले पाहिजेत, असे मत परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रांगणात स्वामीजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी, उपाध्यक्ष संध्या भिडे आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल, अहिल्यादेवी हायस्कूल आणि रेणुका स्वरुप प्रशालेच्या घोषपथकातील विद्यार्थीनींनी वादनातून विवेकानंद यांना आदरांजली अर्पण केली. जयोस्तुते… या गीताचे सादरीकरण घोषाच्या माध्यमातून विद्यार्थीनींनी केले.
सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. मागील ४२ वर्षांपासून हा कार्यक्रम आम्ही सातत्याने घेत आहोत. स्वामी विवेकानंद यांचे कार्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावा, हा यामागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पाचपोर यांनी स्वागत गीत सादर केले. एस.आर.कुलकर्णी यांनी स्वागत केले. संध्या भिडे यांनी आभार मानले.
