Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

महात्मा गांधी यांच्यावर चित्रपटसृष्टीने प्रचंड प्रेम केले – प्रकाश मगदूम

छत्रपती संभाजीनगर  : आपण महात्मा गांधी यांना एका विशिष्ट भूमिकेत पाहिलेले आहे. आपण त्यांना जेंव्हा सिनेमाशी जोडतो तेंव्हा एक आगळे वेगळे समीकरण तयार होते. चित्रपट न आवडणाऱ्या एका माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले, की जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते, असे प्रतिपादन केंद्र शासन – पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदूम यांनी आज येथे केले.

नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा चौथा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. केंद्र शासन – पीआयबीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदूम यांच्या ‘गांधी आणि सिनेमा’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन आज महोत्सवात करण्यात आले होते. यावेळी मगदूम यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मगदूम म्हणाले, हलत्या बोलत्या चित्रांचे जे सिनेमा नावाचे माध्यम आहे त्यामध्ये या माणसाविषयीचे कुतूहल काही कमी होत नाही. यातला विरोधाभास असा की, गांधींना सिनेमा आवडत नव्हता. केवळ वेळ वाया घालवण्याची ही गोष्ट असून, त्यापासून काहीही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, असे त्यांचे मत होते आणि त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले.

गांधींचे जीवन हे अनेक चमत्कारी गोष्टींनी भरलेले आहे आणि त्यातील नाट्याकडे अनेकानेक चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष आकृष्ट झाले. गांधीजींची मूल्ये आणि तत्वे यावर विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळया कालावधीमध्ये चित्रपट बनले. त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण आढावा घेणारे चरित्रपट बनले. गांधीजी जिवंत असते, तर सध्याच्या प्रश्नावर त्यांची काय भूमिका असती, असा कल्पनाविलास करूनसुद्धा ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ कलाकृती बनवली गेली, असल्याचे मगदूम यावेळी म्हणाले.

मगदूम म्हणाले की, तत्कालीन काळात घडणाऱ्या गोष्टी या न्यूज रिल्सच्या माध्यमातून दाखवल्या जात असत. महात्मा गांधी यांच्या जीवनावर खूप साऱ्या न्यूज रिल्स बनवल्या गेलेल्या आहेत. १९२७ साली महात्मा गांधी यांनी आपली पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीच्या बातम्या न्यूयॉर्क टाईम्स’सहित अनेक वृत्तपत्रांनी छापल्या!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading