Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

स्थलांतरितासाठीच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज – शेखर देशमुख


पुणे – स्थलांतरित नागरिकांचे प्रश्न आणि गरजा समजून घेण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज असल्याचे मत वरिष्ठ पत्रकार आणि लेखक शेखर देशमुख यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्रातर्फे (सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या) आयोजित डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार व्याख्यानमालेत ते बोलत होते. देशमुख यांनी सक्तीचे स्थलांतर आणि कोंडीग्रस्त स्थलांतरीत : सामाजिक-आरोग्यविषयक तुटलेपणाचे वर्तमान वास्तव या विषयावर आपले विचार मांडले.

भारतात स्थलांतरितांचे प्रश्न अत्यंत कळीचे आहेत हे कोरोना काळात प्रकर्षाने जाणवले. त्यातही उत्तर प्रदेश आणि बिहार येथील स्थलांतरिताचे प्रमाण अधिक दिसून येते. स्थलांतरितांचे प्रमाण, स्थलांतरिताची जात, धर्म, स्थलांतरितांचे आरोग्य याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. शिवाय स्थलांतरितांचे मानसिक आरोग्य आणि शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचे देशमुख म्हणाले. स्थलांतरितांची कोंडीग्रस्तता जितकी आर्थिक व सामाजिक आहे, त्याहीपेक्षा अधिक मानसिक-भावनिक आणि आरोग्यविषयक आहे असेही ते यावेळी म्हणाले.

विद्यापीठाच्या आंबेडकर भवन मध्ये झालेल्या या व्याख्यानाची पार्श्वभूमी श्री अनंत लाभसेटवार यांनी मांडली तर आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ. राजेश्वरी देशपांडे यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठातील विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading