Wednesday, June 10, 2026
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरांचे अद्भुत गारूड

पुणे  : सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली. ‘सवाई’च्या विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये, अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती. कौशिकी यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले.
सायंकाळी सहाच्या सुमारास कौशिकी यांचे स्वरमंचावर आगमन होताच, रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनाने रसिकांमध्ये उसळलेली चैतन्य आणि उत्साहाची लहर अवर्णनीय होती. रसिकांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून, तरूणाई, प्रौढ आणि बुजुर्गांपर्यंत सर्व प्रकारच्या श्रोत्यांचा समावेश होता.
कौशिकी यांनी समयोचित अशा ‘पूरिया कल्याण ‘ रागात ‘होवन लगी सांज’ हा पारंपरिक ख्याल झुमरा तालात सादर केला. पाठोपाठ तीन तालात ‘सुनलीनो मोरी शाम’ ही द्रुत बंदिश सादर केली.‌तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा अतिशय मधुर आवाज, प्रसन्न मुद्रेने स्वतः आनंद घेत केलेले सादरीकरण, साथीदारांना वेळोवेळी दिलेली दाद आणि हे सारे सांभाळून रागभाव आणि बंदिशीमधून व्यक्त होणारा मूड नेमकेपणाने कायम ठेवण्याचे कौशल्य… यामुळे त्यांच्या गायनाने अल्पवयीन रसिकांच्या मनाची पकड घेतली. द्रुत लयीतील गायनात सरगमचे विविध पॅटर्न, वैविध्यपूर्ण लयकारी यामुळे त्यांनी वेगळा आनंद दिला.
आदीदेव महादेव, ही यमन रागातील शिवस्वरूपाचे वर्णन करणारी रचना, पहाडी ठुमरी सादर करताना कौशिकी यांचे भावदर्शन उल्लेखनीय होते. ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ या रचनेत कौशिकी यांनी अत्यंत नजाकतदार स्वराकृतींनी मांडणी केली. लगेच अतिशय वेगळ्या भावावस्थेचे वर्णन करणारी ‘हरी ओम् तत्सद्’  ही रचना सादर करून कौशिकी यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
त्यांना ओजस अढिया (तबला), तन्मय देवचके (हार्मोनियम), उस्ताद मुराद खान (सारंगी) यांनी रंगतीत भर घालणारी साथ केली. अनुजा क्षीरसागर आणि आलापिनी निसळ यांनी तानपुरा साथ केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading