Tuesday, July 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भाजपा समर्थित १००० हून अधिक सरपंच विजयी – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

मुंबई : राज्यात झालेल्या २३५९ ग्रामपंचायतींपैकी १००० हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नागपूर येथे श्री बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. विजयी झालेल्या महायुतीमधील सर्व घटक पक्ष समर्थित उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मविआकडे असणाऱ्या ६० टक्के ग्रामपंचायती भाजपा व महायुतीच्या समर्थित उमेदवारांनी खेचून आणल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने राबविलेल्या योजना थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहचत असल्याने हे यश मिळाले. आमच्या अपेक्षेपेक्षाही मोठा विजय भाजपा व महायुतीने मिळविला असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी यावेळी दिली. मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र व महायुतीच्या राज्य सरकारने राबविलेल्या जनकल्याणाच्या योजनांमुळे होणारा बदल जनता अनुभवत आहे, हा विजय त्याचेच प्रतिबिंब आहे.

 

  • सरपंचपदाचे महायुती व भाजपा समर्थित उमेदवारांचा विजय म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांचा भाजपावर असणारा विश्वास आहे. भाजपा सत्ता आणि संघटन ही दोन्ही चाके सुयोग्य पद्धतीने चालवित असल्याने शेवटचा बुथवरचा कार्यकर्ता चांगला लढला. त्याचेच हे यश आहे.
  • चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading