Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील या पाच मंडळांना मिळाला “अग्निसुरक्षित गणेश मंडळांचा” मान..

पुणे : पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. राज्यासह परराज्यातून भाविक उत्सवाच्या कालावधीत शहरात येतात. मंडपाच्या परिसरात आग लागणे, तसेच एखादी दुर्घटना घडल्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून उपाययोजनेच्या दृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळ’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेत ढोले पाटील रोडवरील तरुण विकास मंडळ, कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळ ट्रस्ट, हडपसर येथील निओ गणेश मंडळ, नवी पेठ येथील अष्टविनायक गणेश मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या पाच मंडळांना ‘अग्निसुरक्षित गणेश मंडळांचा’ मान मिळाला आहे. पुणे अग्निशमन दल, “फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया” (एफएसएआय), सिटी कॉर्पोरेशन ली. अमोनोरा, सेक्युरिटी शेल्स इन्फोटेक, अनिता क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २७० मंडळ सहभाग घेतला होता, त्यातील ३० मंडळे अंतिम फेरीत पोहचली व त्याचे परीक्षण होऊन त्यातील पाच विभागातील मंडळांना विजेते घोषित करण्यात आले. अमनोरा फर्न क्लब येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

पुणे अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, निवृत्त अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, निवृत्त अग्निशमन अधिकारी किरण गावडे, विनायक साने यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. एफएसएआय पुणे अध्यक्षा अर्चना गव्हाणे, सचिव संजीव तिवारी, सिटी कॉर्पोरेशन ली. चे मार्केटिंग हेड आदित्य देशपांडे, अग्निशमन अधिकारी गजानन पाथरुडकर, महेश गव्हाणे, अनिता तिवारी, सुजल शाह, जे.के. भोसले, कर्नल संजीव मुजुमदार, आनंद गाडेकर, जॉबी अब्राहाम, अमोल उंबरजे, विनायक वाघमारे उपस्थित होते. तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून रियाझ काझी, संदीप महादेवकर, अतुल काकडे, धनराज वाले, राहुल कांबळे, हेमंत भोसले, शशांक कुलकर्णी, खेडेकर आदींनी काम पहिले.

अर्चना गव्हाणे म्हणाल्या की, गणेशोत्सव काळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला आहे. पुण्यातील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मंडपात एका वेळी दोन ते तीन हजार भाविक उपस्थित असतात. अशा वेळी आग लागल्याची घटना घडल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे उत्सवादरम्यान जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर सरकारी यंत्रणांची मदत पोहोचेपर्यंत बचाव कार्य कसे करायचे ? याबाबत कार्यकर्ते प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. योग्य स्पॉटला सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, रोषणाई करताना केलेली वायरींगची तपासणी, आग विझवण्याच्या साधनांची तपासणी, आपत्कालीन वेळी बाहेर निघण्याची व्यवस्था , मेटल डिटेक्टर सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत उपाय करण्याचे मंडळातील कार्यकर्त्यांना मॉक ड्रील देणे अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या वेळी एफएसएआय आणि पुणे अग्निशमन दलाकडून करण्यात आले.

आदित्य देशपांडे म्हणाले, हि स्पर्धा पुण्यात पहिल्यांदाच भरविण्यात आलेली असतानादेखील याला भरगोस प्रतिसाद मिळाला. पुढच्यावर्षी सर्वच्या सर्व गणेश मंडळांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांनी आपत्कालीन परिस्थिती कशी हातळायची याचे उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण घेतले त्यामुळे भविष्यात समाजात काही अनुचित घटना घडल्यास हेच कार्यकर्ते प्रशासनास मदत करण्यात तत्पर असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading