नीलाद्री कुमार यांच्या सुरबहार, सतार आणि झितार सादरीकरणात पुणेकर गुंग
पुणे : तालचक्र महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप नीलाद्री कुमार यांच्या सुरबहार, सतार आणि झितार वादनाने झाला. तीनही वाद्यांचा आविष्कार यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभवला आणि त्याला उत्फुर्त प्रतिसादही दिला.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ११ वा तालचक्र महोत्सव संपन्न होत असून पंडित विजय घाटे व पुनीत बालन समूह हे या वर्षी महोत्सवाचे प्रमुख आयोजक आहेत.
आज पद्मश्री पंडित विजय घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बँक ऑफ इंडियाचे सह महाव्यवस्थापक अभिनव काळे, चंदुकाका सराफचे जाहिरात व विपणन प्रमुख अमोल पात्रे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. याबरोबरच ओर्लीकॉन बाल्झरचे प्रवीण शिरसे व सराफ अॅंड सन्सच्या विपणन प्रमुख वैष्णवी ताम्हाणे. लोकमान्य मल्टीपर्पजचे पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव हे देखील या वेळी उपस्थित होते.
आज सूरबहार हे वाद्य रसिकांसमोर वाजवीत असतानाचा अनुभव हा नक्कीच चॅलेंजिंग असणार आहे असे सांगत नीलाद्री म्हणाले, “सूरबहार हे वाद्य वाजवण्यापेक्षा त्यासोबत प्रवास करणे हे जास्त कठीण आहे असे मला नेहमीच वाटते. म्हणून मुंबईच्या जवळपासच मी याचे प्रयोग करू शकतो. पुण्यासारखे श्रोते हे जगात नाहीत हे मी कायमच म्हणतो. असे वेगळे प्रयोग हे केवळ पुण्यातच करता येतात कारण इथले श्रोते प्रेमाने ऐकतात आणि आशीर्वादही देतात.”
यानंतर नीलाद्री कुमार यांनी सूरबहार वाद्यावर राग जयजयवंती सादर केला. त्यांनी सादर केलेल्या राग दरबारीमधील विलंबित तीन तालातील बंदिशीने उपस्थितांची मने जिंकली. झितारवर नीलाद्री यांनी काही चित्रपट गीतेही सादर केली ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
त्यांना पं विजय घाटे (तबला), श्रीधर पार्थसारथी (मृदंगम), अॅग्नेलो फर्नांडिस (की बोर्ड) आणि मुकुल डोंगरे (ड्रम्स) यांनी साथसंगत केली. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
