Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

स्त्रियांना प्रगती करण्याचे स्वातंत्र्य द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : समाजाचा दृष्टिकोन वेगाने नाही तर खूप हळूहळू बदलत आहे. आपल्या देशात मुलींवर अनेक विचारांचा दबाव असल्याचा दिसतो. मला परदेशात हिंदू, ख्रिश्चन अनेक जाती धर्माच्या स्त्रिया आणि मुली भेटल्या. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की, त्यांना सर्व मुभा मिळाल्या नाहीत, तरी देखील चालेल पण प्रगती करण्याचे स्वातंत्र्य मात्र हवे आहे. त्यांना समाज परिवर्तनाची आशा आहे. त्यामुळे स्त्रियांना प्रगती करण्याचे स्वातंत्र्य द्या, असे मत विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

कात्रजमधील श्री भवानी माताजी जैन मंदिर ट्रस्ट तर्फे नवरात्रीनिमित्त आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कात्रज भिलारेवाडी येथील भवानी माता मंदिरात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. उद्योजक मनोज छाजेड,  ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर, अध्यक्ष रसिकलाल नाहर, संपतराज नाहर, अभय नाहर, उपाध्यक्ष सुभाष नाहर, अनिल नाहर सुनील नाहर पृथ्वीराज धोका, बाळासाहेब कर्नावट आदी उपस्थित होते.

यंदाचा हा पुरस्कार जया पन्नालाल नाहर, चित्रा अशोक नाहर नाशिक यांना प्रदान करण्यात आला. तसेच हृदय चिंतन नाहर या ३.५ वर्षीय चिमुकल्याचा विशेष सन्मान करण्यात आला. चक्रासन आणि टो जम्प या प्रकारात त्याने रेकॉर्ड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.

डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जैन समाजातील महिलांचे मला खूप कौतुक वाटते. आज त्या पुढे येऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करताना दिसत आहेत आणि घरातील पुरुष त्यांना साथ देत आहेत, ही खूप सकारात्मक बाब आपल्याला दिसते, असे ही त्यांनी सांगितले. श्री भवानी माताजी ट्रस्ट यांनी आयोजित केलेला आदर्श माता पुरस्कार हा योग्य व्यक्तींना देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

तसेच महिला जैन संघटनेच्या प्रमुख राजश्री पारख यांनी संपूर्ण भारतातल्या ५ हजार  परिवारांना एकत्र करून छान उपक्रम करत असलेबाबत व योग्य निवड केल्याबद्दल राजेश नाहर यांचे अभिनंदन केले.

राजेश नाहर म्हणाले, नाहर समाजातील सर्वांना एकत्र घेवून अनेक सामाजिक कार्य आम्ही करीत आहोत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांना अपेक्षीत मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्याच उद्देशातून यंदाच्या वर्षी वापरात न येणारे जुने कपडे, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पादत्राणे, बॅग्स पर्सेस, खेळणी, भांडी मंदिरात देण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. या वस्तूंची दुरुस्ती करून गरजूंना पुनर्वापरासाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading