डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना “भारतरत्न” पुरस्कार देण्याची श्रध्दांजली सभेत मागणी..!
पुणे : महान कृषीशास्त्रज्ञ आणि भारतीय हरितक्रांतीचे जनक डॅा. एम. एस. स्वामीनाथन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘इंडिया आघाडीच्या घटक पक्षांकडून’ काँग्रेस भवन, पुणे येथे सोमवार दिनांक 09 ऑक्टोबर 2023 रोजी श्रद्धांजली सभा घेण्यात आली…!
“डॅा स्वामीनाथन यांनी भारतामधील अन्नटंचाई, दुष्काळ, कुपोषण, शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती या सगळ्या प्रश्नांचा शास्त्रीय अभ्यास करून उपाययोजना सुचवल्या”. हरितक्रांतीच्या माध्यमातून आपला भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार झाला याचं मोठं श्रेय डॅा स्वामीनाथन यांच्याकडे जातं. प्रा स्वामीनाथन यांचे सहकारी राहिलेले कृषीतज्ज्ञ डॉ. आशिष वेले यांनी त्यांच्या या कार्याचा आढावा घेत, त्यांच्यासोबत काम करण्याचे अनुभव सांगितले. स्वामीनाथन यांची गांधी विचारांची बैठक, साधेपणा आणि विरोधी विचारही ऐकून घेण्याचा स्वभाव दर्शविणारे प्रसंग सांगितले..!
गांधीवादी विचारांच्या या थोर ‘राष्ट्रभक्त व कृषी – शास्त्रज्ञास’ मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देऊन, ‘त्यांच्या शेतकऱ्यां विषयी समर्पित जीवनाचा आदर्श’ देशवासियांपुढे ठेवणे गरजेचे असल्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी श्रध्दांजली पर भाषणात केली..!
ॲड. मोहन वाडेकर यांनी भुकेलेल्या भारतीयांना मीलो आणि मका खाण्यापासून मुक्ती देणाऱ्या स्वामीनाथन यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दिपक पाटील आणि ॲड नाथाभाऊ शिंगाडे यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली.
अध्यक्षीय भाषणात, कृषीरत्न, कृषिभूषण डॉ. बुधाजिराव मुळीक यांनी स्वामीनाथन यांच्या संशोधन कार्याचे महत्व विषद केले आणि त्यांना मरणोत्तर “भारतरत्न पदवी देण्याच्या गोपाळ तिवारींच्या मागणीचे समर्थन ही केले.
उल्हासदादा पवार यांनी स्वामीनाथन व जनरल माणेकशाँ यांचे लहानपण महात्मा गांधी यांचे समोर कसे गेले याचे किस्से सांगितले तर ॲड. अभय छाजेड यांनी शेतकऱ्यास सरकारने हमीभाव देण्याविषयी ते आग्रही असल्याचे सांगीतले.
या सभेत, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमलताई व्यवहारे, प्रा. विकास देशपांडे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, संजय मोरे, अकबर शेख, सीमा महाडिक, सतिश सावंत, नलिनी दोरगे, ॲड स्वप्नील जगताप, विनायक पाटील इ. विविध क्षेत्रातील राजकीय व समाजिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
ॲड संदीप ताम्हनकर यांनी आयोजन आणि सूत्रसंचालन केले. प्रा. स्वामीनाथन यांना आपल्या कळपात ओढायचे काही घटक प्रयत्न करतील, ते होऊ देऊ नये असे त्यांनी सांगितले. हनुमंत पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
