कुठल्याही शहराचे वैभव हे त्या शहराच्या सांस्कृतिक विकासावर ठरते : सचिन ईटकर
तळेगाव दाभाडे, : शहराचा विकास हा किती इमारती, किती आर्थिक सुबत्ता आहे यावर अवलंबून नसून, त्या शहरामध्ये साहित्य, कला, संस्कृती, नाट्य या सगळ्यांचा वावर कसा आहे, यावर त्या शहराचे वैभव ठरत असते, असे मत महाराष्ट्र राज्याचे आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवाधाम ट्रस्टचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. किरण देशमुख, डॉ. वर्षा वाढोकर, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, कवी पुरुषोत्तम सदाफुले, महेंद्र भारती, शाहीर प्रभाकर वाघोले आदी उपस्थित होते. दरम्यान, सरस्वती विद्यामंदिरच्या शिक्षिका छाया सांगळे, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका अश्विनी काळे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
सचिन ईटकर म्हणाले, की देशाच्या प्रगतीमध्ये सगळ्यात जास्त वाटा शिक्षकांचा आहे. चांगली पिढी घडवण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान हा समाजाच्या दृष्टीने महत्त्वची गोष्ट आहे. तळेगाव आणि मावळ तालुक्याच्या सांस्कृतिक विकास आणि वाटचालीमध्ये नाट्य परिषदेचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी निर्माण केलेला सांस्कृतिक वारसा या शहराचे वैभव आहे.
सुरेश धोत्रे म्हणाले, की तळेगावातील साहित्यप्रेमी व रसिकांसाठी सेवाधाम ट्रस्ट नेहमीच अग्रभागी असते. या पुढेही संस्था असेच काम करीत राहणार आहे.
प्रास्ताविक सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या सचिव डॉ. वर्षाताई वाढोकर यांनी केले. त्यांनी सेवाधाम ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन नृत्य अभ्यासक डॉ. मीनल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाचे डॉ. मलिंद निकम, अमित बांदल, ग्रंथपाल घोजगे, राजेश बारणे यांनी परिश्रम घेतले.
निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद :
निबंध स्पधेत ५ वी ते ७ वी या गटामध्ये ८९ व ८ वी ते १० वी या गटात ८३ विद्यार्थ्यांचा, तर खुल्या गटात १० स्पर्धकांचा सहभाग होता. निबंध स्पर्धेचे परीक्षण सचिन लांडगे, नयना डोळस (प्राथमिक विभाग), श्रीकृष्ण पुरंदरे, जी.पी. गिरमकर, विश्वास देशपांडे (माध्यमिक विभाग), जयश्री जोशी (खुला गट) यांनी केले.
निबंध स्पर्धेचा निकाल –
प्राथमिक विभाग : ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक – समृद्धी गावडे, सरस्वती विद्या मंदिर,
द्वीतीय क्रमांक –अथर्व हरवंदे, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल.
माध्यमिक विभाग : ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक – अनुप्रिया लबडे, सरस्वती विद्या मंदिर.
द्वीतीय क्रमांक – भूमिका कडू, सरस्वती विद्या मंदिर.
खुला गट :
प्रथम क्रमांक – राजश्री बनसोडे
द्वीतीय क्रमांक – राजेंद्र गुर्जर
