Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

येत्या निवडणुका शरद पवारांची शेवटची लढाई! चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

कोल्हापूर : हिंदूहृ्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेले होते. तर शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहीत धरले होते. यामुळे दोन्ही नेते एकटे पडले आहेत. शरद पवार तर शेवटची लढाई लढत आहेत. त्यांच्याकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते व पक्ष शोधावा लागत आहे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. निवडणूक जशी-जशी जवळ येईल तसे त्यांच्याकडे कार्यकर्ते दिसणार नाहीत.

कोल्हापूर लोकसभा प्रवासात ते माध्यमांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, भाजपाचा विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे. जो पक्ष विकास करू शकतो त्याच पक्षाच्या मागे लोक उभे राहतात. म्हणूनच अजित पवार व एकनाथ शिंदे यांना समर्थन मिळत आहे. महायुतीमध्ये भाजपाची भूमिका मोठ्या भावाची आहे. आम्ही पक्षापेक्षा देशासाठी काम करणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे किंवा अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यात गैर काहीच नाही.

त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा निवडणूक प्रमुख खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, कोल्हापूर लोकसभा समनव्यक भरत पाटील, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर दक्षीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य संग्राम कुपेकर, समरजितसिंग घाडगे, शिवाजीराव पाटील, शौमिका महाडिक, हंबीरराव पाटील, सत्यजित कदम, बाळासाहेब कुपेकर, भैय्यासाहेब कुपेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिताताई चौगुले, डॉ. प्रकाश शहापुरकर, प्रकाश चव्हाण, नाथाजी पाटील, अशोक चरटी, डॉ. आनंद गुरव, संतोष तेली, राजेंद्र तराळे, प्रीतम कापसे, शैलेंद्र कवणेकर, रवींद्र घोरपडे, शांताराम पाटील, निलांबरी भुईबर, संजय सावंत, अजित ठाणेकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • उमेदवारीचा निर्णय पार्लमेंट बोर्डाचा

जसा पक्ष मोठा होतो, त्याची व्याप्ती वाढत जाते, तेव्हा काही लोकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होते. जनसंघ किंवा भाजपच्या स्थापनेपासूनचे काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी असे वाटत असले तरी वास्तविक मेरिट पाहूनच उमेदवारी देण्याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंट बोर्ड घेतो. भाजपामध्ये नाराज कार्यकर्ते असतील तर त्यावर मार्ग काढू असेही ते म्हणाले.

  • महाराष्ट्रात विजय महायुतीचाच

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महायुती लोकसभेच्या ४५ हून अधिक तर विधानसभेच्या २२५ हून अधिक जागांवर विजय मिळविणार आहे. भाजपा राज्यभरात ‘घर चलो अभियान आणि महाविजय-2024’ राबवित असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

  • गडहिंग्लजमध्ये जनतेचा प्रचंड प्रतिसाद

प्रदेशाध्यक्षांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा गडहिंग्लज येथून सुरू केला. येथील मंत्री हॉलमध्ये त्यांनी कागल, चंदगड आणि राधानगरी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्सशी संवाद साधाला. त्यानंतर बसवेश्वर महाराज पुतळा ते एसटीस्टॅंडपर्यंत घर चलो अभियानात सहभागी झाले व जनतेशी संवाद साधला. या अभियानाला गडहिंग्लजवासींनी उंदड प्रतिसाद दिला व मोदी मोदीचे नारे लगावले. गडहिंग्लज येथे प्रसिद्ध उद्योजक अरविंद अण्णा कितुरकर यांच्याशी स्नेह भेट घेतली व त्यांना मोदी@२० हे पुस्तक भेट देत समर्थन मागितले.

  • महायुतीचा उमेदवार विजयी करा

कोल्हापूर येथील रावजी मंगल कार्यालयात त्यांनी करवीर, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधाला.कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. काश्‍मीरमधून ३७० कलम हटवून तेथे तिरंगा फडकावणे, राम मंदिर उभारणी, महिलांना आरक्षण हे फक्त मोदींच्या नेतृत्वातच शक्य झाले आहे. मोदी सरकारच्या योजना घरोघरी पोहचवून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. सायंकाळी त्यांनी बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोडपर्यंत घर चलो अभियानात सहभागी झाले. कोल्हापूरवासींनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन देण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading