राज्यातील निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे – स्वतःला ट्रीपल इंजिन म्हणवून घेणारे महायुती सरकार प्रत्यक्षात केवळ कंत्राटदारांच्या सेवेसाठी काम करत आहे. सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यातील आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर आहे. मागच्याच महिन्यात ठाण्यातील शासकीय रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती. त्या घटनेतून बोध घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन उपाययोजना करणे ही राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची प्राथमिक जबाबदारी होती. परंतू मंत्री महोदयांना राजकीय कुरघोड्या, सभा – समारंभ यातून फुरसत मिळत नसल्याने राज्यातील आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. याचाच परिणाम म्हणून पुरेशा सुविधांच्या अभावी नांदेड व छत्रपती संभाजीनगर व आज नागपूर येथे शासकीय रूग्णालयात मिळून जवळपास ७९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी हॉस्पिटल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
सत्ताधाऱ्यांमध्ये नैतिकता शिल्लक नसल्याने त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची शक्यता नाही. तथापि राज्याचे प्रमुख म्हणून या घटनेची जबाबदारी निश्चित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निष्क्रिय आरोग्यमंत्र्यांचा व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही यावेळी प्रशांत जगताप यांनी केली.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह प्रकाश(आप्पा) म्हस्के, डॉ. सुनिल जगताप, डॉ. शशिकांत कदम, किशोर कांबळे, आशिष माने, शैलेश राजगुरू, मनाली भिलारे, डॉ. पवन सोनावणे,फहीम शेख, सागर खांदवे, अश्विनी परेरा, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर,अक्षता राजगुरू यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
