Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

…तर गुन्हेगारीकडे वळालो असतो

पुणे : जय गणेश पालकत्व योजनेचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो आहे, योग्य वेळी जर दगडूशेठ ट्रस्टने मदतीचा हात दिला नसता तर मी पोलीस न होता गुन्हेगारी क्षेत्राकडे नक्कीच वळलो असतो. माझी परिस्थिती बेताची होती त्यामुळे पुढे शिक्षण घेता येईल की नाही असा प्रश्न असताना ट्रस्टने मला चांगले शिक्षण देत माणूस म्हणून घडविण्यास मदत केली, अशी भावना जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत विद्यार्थी असलेल्या आणि आता भोसरी एमआयडीसी येथे पोलीस म्हणून कार्यरत अनिकेत कांबळे याने व्यक्त केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, डॉ.अ.ल. देशमुख, डॉ. संजीव डोळे, इंद्रजीत रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सचिन आखाडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी योजनेतील इयत्ता १० वी चे ११, इयत्ता १२ वी १६ आणि कोंढवा बालसंगोपन केंद्रातील ५ यशस्वी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता साध्य करायला पाहिजे. त्यासाठी मेहनत करणे हे निश्चितच आपल्या हातात आहे. आपली मेहनत, आई-वडिलांची पुण्याई आणि बाप्पाचा आशिर्वाद यामुळे आपले ध्येय निश्चित साध्य होईल. इतर गोष्टीत अडकलात तर ध्येय गाठणे कठीण होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व संस्कार देण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काम केले जाते ते खूप महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त करीत यांनी पोलीस क्षेत्रात आपण कसे आलो, हे देखील उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.

महेश शिंदे म्हणाले, आपल्याला आयुष्यात कोणते ध्येय गाठायचे आहे,आपल्याला काय व्हायचे आहे हे सांगायचे धैर्य आपल्यात असायला हवे. स्पर्धा परिक्षा ही आवड असणा?्यांसाठी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणा-या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना दुसरा पर्याय तयार ठेवणे गरजेचे आहे. ज्ञानदीप अ‍ॅकॅडमीच्या वतीने जय गणेश पालकत्व योजनेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ३ वर्षे विनामूल्य स्पर्धा परिक्षेचे शिक्षण देण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अ.ल. देशमुख म्हणाले, चांगले शिक्षण देण्यासोबतच उत्तम नागरिक बनविण्यासाठी जय गणेश पालकत्व योजना काम करते. चारित्र्यवान नागरिकांची गरज समाजाला आहे. एकवेळ बुद्धीमत्ता कमी असली तरी चालेल परंतु कष्ट, अभ्यास आणि सातत्य विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले. प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी यांनी योजनेविषयी माहिती सांगितली. हेमंत रासने यांनी मनोगत व्यक्त केले.

पालकत्व योजनेतील विद्यार्थीनी असलेल्या इन्फोसिस कंपनीमधील वैभवी वनारसे आणि एलिसियम सोल्युशन्स कंपनीमधील शुभांगी परदेशी म्हणाल्या, शिक्षण घेण्याची आवड होती. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेण्यास अडचणी येत होत्या, ट्रस्टने शिक्षण, आरोग्य या सोबतच आमचा सर्वांगीण विकास देखील केला. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. ट्रस्ट मुळे आज एका चांगल्या कंपनीत कार्यरत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading