आता इयत्ता 5 वी ,8 च्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पास व्हावे लागणार
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली असून आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे पाचवी किंवा आठवी मध्ये विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. त्यासंदर्भातील राजपत्र शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे.
शिक्षण हक्क कायद्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नव्हते. परंतु, आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे या संदर्भातील कार्यपद्धती निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे
