संतापजनक : वारी दरम्यान पारधी समाजाच्या 150 जणांना पोलिसांनी डांबून ठेवले
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे काल प्रस्थान. यावेळी वारकऱ्यांवर लाठीचार केल्याने सर्वच स्तरातून शिंदे – फडणवीस सरकारवर टीका होत आहे. त्यातच पालखी प्रस्थानाच्यावेळी आळंदी पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये दिवसभर एका छोट्या खोलीत उपाशी डांबून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मानवाधिकारी वकील अॅ ड. असीम सरोदे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहीत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. अॅ ड. असीम सरोदे यांनी म्हंटले आहे की, पारधी समाजातील तब्बल 127 ते 150 जणांना वारी आहे म्हणून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आलेले आहे.यामध्ये स्त्रीया, मुले व पुरुषांचा समावेश आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी या पारधी समाजातील लोकांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे? छोटयाशा जागेत इतक्या जणांना डांबून ठेवल्याने अनेकांचा जीव गुदरमतोय,त्यांना खायला देण्यात आलेले नाही की त्यांना प्यायला पाणी नाही. आळंदी पोलीस स्टेशन झोन 1 च्या अखत्यारीत आहे तेथील ACP असतील त्यांना माझी विनंती की इन्स्पेक्टर सुनील गोडसे यांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का हे सांगावे.

कोणत्या शंकेवरून इन्स्पेक्टर गोडसे पारधी समजतील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात अटक करून ठेवले? त्यांच्यावर गुन्हा नोंदवला का? अश्याप्रकारे मानवीहक्क उल्लंघन करण्याचा गोडसेंना अधिकार दिला कुणी? पारधी समाजातील बांधवांना केवळ वारीच्या पार्श्वभूमीवर डांबून ठेवणे अन्यायकारक आहे.
दरम्यान, आळंदी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी, वारीच्या पार्श्वभूमीवर पाकीटमारी किंवा साखळी चोरीच्या घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. तसेच संध्याकाळी महिलांना सोडून दिले असल्याचेही स्पष्ट केले.
