Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सत्ता टिकवण्यासाठी तेढ निर्माण केली जातेय :डॉ.राम पुनियानी

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ जुन २०२३ रोजी आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले. त्यात डॉ. राम पुनियानी,डॉ. कुमार सप्तर्षी,युवराज मोहिते या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.’ गांधी और सांप्रदायिक सद्भावना’विषयावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राम पुनियानी यांनी मार्गदर्शन केले. ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी,तसेच ‘गांधी-आंबेडकर विचारांचा वारसा आणि महत्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी मार्गदर्शन केले.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे तिसरे शिबीर होते.

पुनियानी यांचा परिचय डॉ.कुमार सप्तर्षी यांनी करून दिला.प्रास्ताविक संदीप बर्वे यांनी केले. जांबुवंत मनोहर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. दत्ता बाळसराफ,डॉ उर्मिला सप्तर्षी,अन्वर राजन,विकास लवांडे ,सुदर्शन चखाले,अप्पा अनारसे,सचिन पांडुळे,नीलम पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिबिराला खास करून उपस्थित राहिलेल्या
राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केला.

डॉ. पुनियानी म्हणाले, ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, त्या त्या धर्मातील वर्चस्ववादी लोकांचे वर्चस्व धोक्यात आल्याने धर्म पुढे करून आपली सत्ता टिकवण्यासाठी धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. “महात्मा गांधींनी मानवतावादी हिंदू धर्म मानला, आणि सर्व धर्मातील नैतिक मूल्ये चांगलीच असतात, हे त्यांनी जाणले, मात्र आपल्या स्वार्थी, मतलबासाठी काही वर्चस्ववादी लोक धर्माचा वापर विष कालवण्यासाठी करत आहेत.चांगल्या प्रकारची, प्रबळ लोकशाही अस्तित्वात येऊ नये आणि तळागाळातील लोकांपर्यंत लोकशाहीचा फायदा, हक्क, सत्ता लाभू नये, याचसाठी आज वर्चस्ववादी देशात धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे, असेही डॉ. पुनियानी यांनी सांगीतले..

ते म्हणाले, ‘मूलतत्ववादी धर्म मानल्याने आणि इतर धर्मांचा अनादर करीत , इतर धर्मियांवर अन्याय केल्याने आज पाकिस्तान आणि श्रीलंकेत जी अवस्था झाली, तीच अवस्था मूलतत्ववादी धार्मिक आक्रमणामुळे भारताची होऊ शकेल.भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग हे इंग्रजांच्या बाजूने होते आणि गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करीत होते, या उलट महात्मा गांधी आणि काँग्रेस हे सर्व धर्मांना एकत्रित घेऊन इंग्रजांना विरोध करून स्वातंत्र्य मिळवणे, हे त्यांचे ध्येय होते’.

‘देशाचे सामुदायिक शहाणपण जिवंत ठेवण्यासाठी आणि जागे करण्यासाठी अशाप्रकारच्या गांधी दर्शन शिबीरांची आवश्यकता असते’, असे मत डॉ सप्तर्षी यांनी व्यक्त केले.ते म्हणाले,’गेल्या शतकातील दोनच गोष्टी जगभर मान्यता पावल्या आहेत, आणि ज्यांची चर्चा आजही जगभर होत असते, त्या म्हणजे एक अणुबॉम्ब निर्मिती आणि दुसरे महात्मा गांधी.महात्मा गांधी हे भारतीय विवेकाचे प्रतीक आहे. भारतीय विवेक जागा ठेवला तरच जगाचा विवेक जागा राहू शकेल,आणि त्यासाठीच गांधी विचार दर्शन हा आपल्या पुढे आदर्श आहे.’, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी घेतले आशीर्वाद !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी गांधी दर्शन शिबिराच्या निमित्ताने गांधी भवन ला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला वंदन केले. युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांचे आशीर्वाद घेतले. गांधी दर्शन शिबिरात वक्त्यांचे विचार त्यांनी ऐकले. डॉ.कुमार सप्तर्षी यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार केला.मागील महिन्यातही खा.सुळे यांनी गांधी भवनला भेट दिली होती. दत्ता बाळसराफ,विकास लवांडे तसेच युक्रांद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading