जात धर्माच्या सीमा ओलांडणारी कविता सर्वश्रेष्ठ- लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कवीने इतरांचे अनुकरण न करता शब्द आणि प्रतिभेचे जे वरदान आपल्याला मिळाले आहे त्याला साहित्याचे कोंदण देऊन समाजाला दृष्टिकोन आणि जगण्याची उमेद दिली पाहिजे.
कविता किंवा साहित्य हे केवळ मनोरंजन नव्हे तर त्या पलीकडे जाऊन जीवनाचा दृष्टिकोन देणारी एक तपस्या आहे. ही तपस्या सर्वांनाच प्राप्त होते असे नाही. इतरांच्या अनुभवाने किंवा दृष्टीने जग न पाहता कवीने आपल्या अनुभवातून कविता निर्माण करावी आणि त्यातून जग अनुभवण्याचा आनंद दिला पाहिजे.
उद्धव कानडे म्हणाले, कवींना विशेषतः ग्रामीण भागातील कवींना व्यासपीठ मिळवून देणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कवितेवर केवळ बोलू नये तर त्याचा आनंद घेतला पाहिजे कविता ही माणसाला आत्ममग्न करते. कवीने आपल्याला मिळालेल्या प्रतिभेला साधनेची जोड दिली तर त्यातून निश्चितच चांगल्या प्रकारची साहित्यकृती निर्माण होऊ शकते.
गौरी रत्नपारखी म्हणाल्या. कविता ही स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर समाजासाठी असते. कविता समाजासमोर आली तर कवीच्या प्रतिभेला अधिक बहर येतो. त्यातून कवीचा आत्मविश्वास वाढतो.
नीता चिकारे, प्राची जोशी, शरद करमरकर, मुकुंद काजरेकर, गोपाल खंडारे, ज्योती मनोहर, अभिषेक मिटके, शिरीष पदकी, प्रवीण पाटील, पूर्वा पित्रे, अतुल सानप, शारदा शेंबवणेकर, रचना वसेकर, गिरीश वसेकर या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा “चाफा” हा काव्यसंग्रह आहे. प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. मानसी चिटणीस यांनी आभार मानले.
