नवऱ्याच्या जीवावर बसून खायच नाय …. ; स्त्री सक्षमिकरणावर पाणीपुरी विक्रेत्या महिलेचे मोलाचे भाष्य
सांगली : सध्या वाढत्या महागाईत नवऱ्या बरोबरच बायकोने सुद्धा कमावणे व सांसाराला हातभार लावणे आवश्यक बनले आहे. अन् यासाठी स्त्री सक्षमिकरण ही काळाची गरज बनली आहे. मात्र स्त्री सक्षमिकरण ही गरज केवळ एका वर्गापुरती किंवा शहरा पुरती मर्यादित न राहता; ती शहरापासून गावखेड्या पर्यंत अन् शिक्षित महिलांपासून आडाणी महिलांपर्यंत निर्माण झाली आहे. याविषयी समर्पक भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
@Sandeshdaniel या युजरने इंस्टाग्रामवर सांगलीतील एका पाणीपुरी विक्रेत्या महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या महिलेचे नाव पार्वती असून त्या कृष्णा घाट सांगली इथे पाणीपुरी विकतात. पार्वती यांनी अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सर्व स्त्रीवर्गाला मोलाचा संदेश दिला आहे. त्या म्हणतात, “शिकलेल्या बायकांनी नोकरी करावी पण आम्ही अडाणी बायका काय करणार? प्रपंच असाच असतो दोन चाकांनी संसार पुढे न्यायाचा असतो त्यामुळे नवऱ्याच्या जीवावर बसून खायचं नाही. आपण पण राबत राहिलं पाहिजे, आपल्याला जे काम जमतं ते करून चार पैसे कमवले पाहिजेत”
