सामाजिक लोकशाही या डॉ. आंबेडकरांच्या संविधानातील संकल्पनेवर जॉन ड्यूई यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो -प्रा. स्कॉट स्ट्रॉउड
पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लोकशाहीसाठी ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ही जीवनाची तत्त्वे मानणारा जीवनाचा एक मार्ग या संविधानातील संकल्पनेवर जॉन ड्यूई यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो असे मत अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या प्रा. स्कॉट स्ट्रॉउड यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागाने आयोजित केलेल्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातील बुद्धिप्रामाण्याधारित वास्तवादाची अपूर्ण उत्क्रांती” या विषयावर वक्ते म्हणून ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. सुरेंद्र जोंधळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर ले. जन. ए. एल चव्हाण, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातील प्रतिष्ठित प्राध्यापक, अमेरिकेतील यूएनसी ग्रीन्सबोरो, येथील डॉ. जेरेमी रिंकर, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठतील डॉ ब्रिजीड फ्रीमन, ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक फेलो मान्यवर अतिथी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार जयदेव गायकवाड, समाज शास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. एस. एम. दहीवाले, प्रकाश गंभीर, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागाने विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांनी व्याख्यानाचे प्रास्ताविक केले.
प्रा. स्कॉट स्ट्रॉउड पुढे म्हणाले भारतातील आधुनिक बुद्धिप्रामाण्यावादाचे प्रमुख उद्गाते म्हणून त्यांचा वैचारिक प्रवास व त्यावर जॉन ड्यूई यांचा प्रभाव समजून घेणे हे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांच्या भारतीय बुद्धिप्रामाण्यवादातील तत्वज्ञानात त्यांच्या अमेरिकेतील १९१६-१९१८ शिक्षणावरील जॉन ड्यूई यांचा वैचारिक प्रभाव दिसून येतो. २० व्या शतकाच्या सुरवातीला निष्क्रियता (पस्सिव्हिटी) आणि शांतता हा सर्वोत्तम मार्ग म्हणून भारतीय पाहत असल्याबद्दल डॉ. आंबेडकर साशंक दिसतात. १९१८ नंतरच्या काळात आंबेडकरांच्या नवयान बुद्धिप्रामाण्यवादासमोर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा समतोल राखून तुम्ही सामाजिक लोकशाही कशी साधता येईल याबद्दल विचार करताना दिसतात. हे करत असताना जात ही सवयीचा भाग म्हणून तर बळ या संकल्पनेतील कारक आणि मारक असा विरोधाभास आणि धर्म हे साधन म्हणून अश्या सारख्या प्रमुख संकल्पना घेऊन डॉ. आंबेडकर यांचा वैचारिक लढा सुरू होता. लोकशाही सुधारणेचे बुद्धिमान साधन म्हणून नवयान बौद्ध धर्म विचार विकसित करणे यावर त्यांचा प्रमुख भर होता.
