… म्हणून मुख्यमंत्री आयोध्येतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
नाशिक : राज्यात गारपीट अन् अवकाळी पावसामुळे शेतकरी बेहाल होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) अन् त्यांचे सर्व मंत्री आयोध्या दौरा करीत आहेत. अशी टीका विरोधकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री आयोध्या दौऱ्यावरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. गारपीट व वादळामुळे नुकसान झालेल्या शेताची पहाणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आयोध्या वरून थेट मुख्यमंत्री अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या नाशिक जिल्ह्यात पोहोचले. येथील बागलाण तालुक्यातील निताने,बिजोटे,आखटवाडे या शिवारात गारपीट व वादळामुळे नुकसान झालेल्या कांदा, पपई, डाळिंब यासह इतर पिके-फळबागांची पाहणी केली. कांदा उत्पादक शेतकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने नोंद घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल शासनास तत्काळ सादर करावा, असे निर्देश दिले. तसेच राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून मदतीबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री यांनी दिले.
