माहीमच्या समुद्रातील ‘ते’अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा.. राज ठाकरे यांचा शिंदे – फडणविसांना इशारा
मुंबई : मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधली गेली असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. जाहीरसभेमध्येच राज यांनी मजारचा व्हिडीओ दाखवला असून महिन्यात हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली आहे. जर हे काम तोडलं नाहीतर तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, जे होईल ते होईल, असा कडक इशाराच राज ठाकरेंनी दिला.
प्रशासनच दुर्लक्ष असल्याने काय घडू शकतं, हे चित्र मी दाखवत आहे. जे या देशातील घटना माणणारे मुसलमान आहे त्यांना आहे मान्य आहे का? हे व्हिडिओ दाखविल्यानंर सरकारने कारवाई करत नसेल तर महिन्याभरात काय होईल मला माहीत नाही. माहीम जवळील समुद्रातील व्हिडीओ दाखविले आहे. ज्यावर मजार बनविले आहे, असा सवालही राज ठाकरेंनी केला. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरतात, पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करणार, आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असे राज ठाकरे म्हणाले.
इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पक्षातून बाहेर पडलो त्यावेळी माझा वाद हा विठ्ठलाशी नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे म्हटले होतो. ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार, त्यात मला वाटेकरी व्हायचं नाही असेही म्हणालो होतो याची आठवण राज यांनी करून दिली.
राज ठाकरे म्हणाले की, तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता. बाळासाहेबांशिवाय कोणालाही शिवधनुष्यबाण झेपणार नाही. एकाला झेपलं नाही आणि दुस-या झेपल की नाही, हे माहित नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. तसेच येणारी रामनवमी जोरात साजरी करा, येत्या 6 जूनला शिवरायांच्या राज्यभिषेकला 350 वर्ष होणार आहे, मी स्वत: रायगडाला जाणार आहे. तुम्ही सुद्धा या. बेसावध राहू नका, पाळत ठेवा, आज बेसावध राहिला तर जमीन निघून जाईल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.