मुंबई – गोवा महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात २२ ठार
मुंबई : रायगड आणि कणकवलीमध्ये आज पहाटे २ भीषण अपघात घडले. कणकवलीजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात १३ प्रवासी ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये ३६ प्रवासी होते. दुसरीकडे, रायगडमध्ये कार-ट्रकच्या धडकेत ९ जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
गोवा-मुंबई महामार्गावर कणकवलीजवळ खासगी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस उलटल्याने ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, २३ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर ९ जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या १३ वर गेली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे ५वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात एकूण ९ प्रवासी ठार झाले आहेत.
रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, आज पहाटे ४.४५ वाजता रेपोली येथे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक व मुंबईकडून गुहागरकडे जाणा-या कारचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये ५ पुरुष, ३ महिला आणि एक लहान मुलगी, अशा ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
एक लहान मुलगा जखमी असून त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. सर्व मृतक एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते सर्वजण गुहागर तालुक्यातील हेदवी येथे जात होते. एका नातेवाईकाच्या निधनाच्या शोकसभेला उपस्थित राहून हे सर्वजण परतत होते. त्याचदरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला.
