सरकार विशिष्ठ धर्मातील नेत्यांना टार्गेट करीत आहे – हसन मुश्रीफ
मुंबई : विरोधी पक्षातील काही विशिष्ठ धर्मातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते नाव घेतात अन् त्या नेत्यांवर ईडी ची कारवाई होते. आधी नवाब मलीक आता मी नंतर असलम शेख अशी नावं घेत सत्ताधारी आम्हाला टार्गेट करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर तसेच कोंढवा येथील मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावर, कार्यालयावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु होती. त्यावर मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या माझ्यावर कथीत साखर कारखान्याच्या घोटाळ्यावरून आरोप करीत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी ने आजची छापेमारी केल्याचा अंदाज आहे. मात्र सोमय्या जेव्हा नाव घेवून कारवाई होणार असल्याचे सांगतात तेव्हा विरोधी पक्षातील काही विशिष्ठ धर्मातील नेत्यांना सत्ताधारी टार्गेट करीत आहेत, असे वाटते.
ईडी आणि आयकर विभाग कोण चालवत?
आयकर विभागाने यापूर्वीच माझ्या घरावर छापेमारी केली होती. शिवाय न्यायालया कडून त्या प्रकरणाला स्टे ऑर्डर ही दिली गेली आहे. त्यानंतरही ईडीने ही कारवाई का केली? हे काळत नाहीये. त्यामुळे ईडी आणि आयकर विभाग कोण चालवत? याचा शोध घेतला जावा, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
चंद्रकांत गायकवाड यांच्याशी व्यावसायायीक संबध नाही
चंद्रकांत गायकवाड ब्रिस्क इंडिया कंपनी सेक्रेटरी आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना ब्रिस्क इंडिया कंपनीनं उभारला होता आणि आप्पासाहेब नलावडे कारखाना देखील ही कंपनी चालवत होती. मात्र, गायकवाड यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायायीक संबध नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोलकत्तास्थित कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाडचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
