अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने स्वरझंकार महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप.
पुणे – व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित व बढेकर ग्रुप प्रस्तुत १४ व्या स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरेल गायनाने झाली.
राग झिंझोटीने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. खानसाहेब अल्लादिया खाँ यांची विलंबित रूपक तालातील रचना व ‘अखियां उनसो लागी…’ ही द्रुत तीन तालातील रचना त्यांनी प्रस्तुत केली. यांनतर त्यांनी राग केदार मध्ये मध्यलय झपतालमध्ये एक रचना व द्रुत एकतालमध्ये ‘नवेली नार…’ ही रचना सादर केली. त्यांनी सादर केलेल्या ‘नजरियां लागे नहीं कहीं और…’ या ठुमरीने उपस्थितांची मने जिंकली. गुरू नानक यांचे ‘क्या कहियें…’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) तर ऋतुजा लाड व श्रुती अभ्यंकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
