संवादावर श्रध्दा ठेवा, विश्वास तुटू देऊ नका : शोभा डे
पुणे : ‘तरुण पिढी आपले भविष्य आहे. त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांचा आपला संवाद होत नाही.युवा पिढी कुटुंबापासून दूर गेली आहे. आपण जागे व्हायला हवेय. त्यांना कुटुंबाबदल विश्वास असायला हवा. श्रद्धा वालकर प्रकरणात ते प्रकर्षाने जाणवले आहे. आपण सर्वांनी बदलायला हवेय. घरचे मला समजून घेतील हा विश्वास संपता कामा नये. संवाद तुटू नये याची काळजी मैत्रीत, घरात, प्रेमात घेतली पाहिजे’,अशा शब्दात प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी रविवारी तरुणाईशी संवाद साधला.
निमित्त होते, डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मधील ‘ इन क्रेडिबल टू अनस्टॉपेबल ‘ कार्यक्रमाचे ! या कार्यक्रमात पत्रकार सुधा मेनन यांनी शोभा डे यांच्याशी संवाद साधला. लेखन, स्त्रीत्व, बॉलीवूड या आवडीच्या विषयावर शोभा डे यांनी दिलखुलास मते मांडली.
शोभा डे म्हणाल्या, ‘मुंबईत असले तरी माझे हृदय पुण्यात असते. मला पुण्यातील मिसळ, कच्छी दाबेली आवडते. पुण्यासारख्या शहरात डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल सारखा चांगला महोत्सव भरतो आहे. पुढील वर्षी मी पुण्यात घर घेऊन पुणेकर होणार आहे ! येत्या महिन्यात माझा वाढदिवस पुण्यात साजरा करणार आहे. ‘
कोरोनानंतर आपण जिवंत आहोत. हाच मोठा उत्सव आहे. आपण नशीबवान आहोत. त्या काळातही माझे लेखन सुरु होते. माझ्यातील मराठी मुलगी जिवंत आहे. भावना, विचार मराठी आहेत. मी कोणाला इंप्रेस करण्यासाठी लिहित नाही.आपला भारतीय समाज दुटप्पी ,दांभिक आहे. कामसूत्र ‘ पुरुष लेखकाने लिहिले.सेक्स बद्दल महिला लेखकाने लिहिलेलं त्याला आवडतेच, असे नाही. माझ्या २० पुस्तकातील नायिका प्रागतिक आहेत. त्यातील दोन, तीन नायिका सेक्सबद्दल बोलतात. तरीही त्याचीच चर्चा होते. मी माझ्या वारशाची काळजी करत नाही. पुढे कसे होईल याची चिंता वाहत नाही. रोजचे जगणे समरसून जगते, असेही शोभा डे यांनी सांगीतले.
बॉलिवूडचे चित्रपट वेडपट वाटले तरी ते आपले जीवन मांडत असतात. लक्ष वेधण्यासाठी अत्यंत कमी कपडे घालून प्रसिद्धी मिळवणे योग्य नाही. त्यातून तुम्ही सेलीब्रिटी होत नाही, असेही मत डे यांनी व्यक्त केले.
देविकाराणी सारख्या अभिनेत्रींनी बॉलीवूड गाजवले आहे. तो प्रवास आता मलायका, उर्फी जावेद पर्यंत आला आहे स्वतःला एकटी समजू नका, कमी समजू नका, असा संदेश त्यांनी महिलांना दिला.
