स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला पाहिजेत -अजित पवार
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात सतत राजकीय स्थित्यंतर निर्माण होत असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला पाहिजेत.असं विरोधीपक्ष नेते अजित पवार हे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
राजकीय स्थित्यंतरामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. सहकाऱ्यातल्या निवडणुका लागल्या. त्याचा निकालही लागला. पण एखादी गोष्ट न्यायवस्थेच्या पुढे असल्याने अंतिम निर्णय न्यायव्यवस्थेचा असतो. पण या सगळ्यात सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांनी आता एक निर्णय घेतला पाहिजे. फेब्रुवारी २०२२ ला पालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या पाहिजे होत्या. अद्यापही या निवडणुका लागल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लहान कार्यकर्त्यालाही काम करण्याची संधी मिळते. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था चव्हाणसाहेबांनी काढल्या होत्या. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे असं आमचं मत आहे. पण तारीख पे तारीख यामुळे कळत नाहीय काय चाललंय. असं अजित पवार म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने होत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन कुणीच करू नये. राज्यपालांना पदावर बसवणाऱ्यांनी त्यांना समज द्यावी. यासंदर्भात आता वरिष्ठांनी विचार करण्याची वेळ आली आहे कारण महत्त्वाचे विषय सोडून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. असं पवार म्हणाले.
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादावरून राजकारण पेटलं आहे. तर दोन्ही राज्यात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी करू नयेत. दोन्ही राज्यांनी आपापलं राज्य चालवावं. असं अजित पवार म्हणाले आहेत.
