Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकास महत्त्वाचा – डाॅ. अनिता पाटील यांचे मत

पुणे : एखादी संस्था किती चांगले काम करु शकते हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून शिकण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही, त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा यासाठी संस्था उपक्रम राबवित असते. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे ही गरजेचे आहे. असे मत भारती विद्यापीठ होमिओपॅथी विभागाच्या अधिष्ठाता डाॅ.अनिता पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन आप्पा बळवंत चौकातील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आले होते. यावेळी डाॅ. संजीव डोळे, डाॅ. प्रदीप गर्गे,  ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेचे प्रमुख डॉ.  अ.ल.देशमुख, संस्कार वर्ग प्रमुख विजय भालेराव, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, नितीन आंबवले, ज्ञानेश्वर रासने, राजाभाऊ पायमोडे आदी उपस्थित होते. आरोग्य शिबिरामध्ये २२  डॉक्टर्सनी ४०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

डॉ. अनिता पाटील म्हणाल्या, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन वर्षभर देखील त्यांना डॉक्टरांची मदत उपलब्ध करून दिली जाते. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट परिसरात भारती विद्यापीठ होमिओपॅथी विभागातर्फे बाह्यरुग्ण विभाग सुरू करून नियमित सेवा देता येईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माणिक चव्हाण म्हणाले, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेअंतर्गत पुणे शहरातील ५२  शाळांमधील ४०० गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्याची साथ मिळावी यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिबिराचे यंदा १२ वे वर्ष आहे. शिबीरात नेत्र आणि दंत तपासणीसह इतर आरोग्यविषयक तक्रारींसदर्भात तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading