इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून प्रवास वर्णने महत्वाची – संदीप परांजपे यांचे मत
पुणे : भारतात आलेल्या परकीय प्रवाशांनी प्रवास वर्णने लिहिली, त्यांची प्रवास वर्णने वाचली तर भारताची सांपत्तिक स्थिती किती समृद्ध होती हे लक्षात येते. या प्रवास वर्णनातून त्यांचे प्रवासी मार्ग, शहरांची वर्णने, वेशभूषा, भोजन, चलन इत्यादी अनेक गोष्टींची माहिती मिळते. इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून प्रवास वर्णने महत्वाची आहेत. असे मत इतिहास अभ्यासक संदीप परांजपे यांनी व्यक्त केले.
डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आणि इतिहास संस्कृती कट्टा आयोजित व्याख्यानमालेच्या १४ व्या पुष्पात ‘इतिहासातील निवडक प्रवासी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधक मंडळात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतात आलेले परकीय प्रवासी’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण देखील करण्यात आले. मंदार लवाटे, डॉ. सचिन जोशी , एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, जय पाठक, डॉ. शिवेंद्र काडगांवकर गोपाळ जोशी ,विशाल खुळे, चिंतामण केळकर, राजेंद्र टिपरे, महेश फळसणकर उपस्थित होते.
