Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सिंचन क्षेत्रात अजित पवार यांनी केलेले काम मोलाचे आहे -जयंत पाटील


पुणे:महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमीन सिंचनाद्वारे ओलिताखाली आणून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखविण्याचे काम अजित पवार यांनी जलसंपदामंत्री या नात्याने केले.
सिंचन विभागातील ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवार यांना नाहक बदनाम करण्यात आले. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले हे महत्त्वाचे आहे. सिंचन क्षेत्रात अजित पवार यांनी केलेले काम मोलाचे आहे.असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले.
पुरंदर पब्लिसिटीतर्फे ‘कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे : अजितदादा पवार’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी खासदार अशोक मोहोळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील आणि पुरंदर पब्लिसिटीचे विजय कोलते या वेळी उपस्थित होते.
पश्चिम बंगालमध्ये पूल पडल्यावर त्याचे राजकारण करणारे देशाचे नेतृत्व त्यांच्याच गुजरातमध्ये पडलेल्या पुलाबाबत सोयीस्कर मौन बाळगतात.
एवढेच नव्हे तर गुजरात पूल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यामुळे त्याविषयावर राजकारण न करण्याची भूमिका राहुल गांधी घेतात, हा दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक आहे. हीच खरी सभ्यता असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
१९९० पासून सात निवडणुकांमध्ये मी, अजितदादा, दिलीप वळसे पाटील एकत्र काम करत आहोत. आम्ही सत्तेत असताना माझ्याकडे अर्थमंत्री आणि अजित पवारांकडे कृष्णा खोरे प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी सरकारची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. शंभर रूपये आवक असताना खर्च ११३ रुपये होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत कृष्णा खोरे प्रकल्पासाठी उद्योजक आणि गुंतवणूकदारांना आम्ही दोघांनी मिळून गुंतववणुकीसाठी प्रवृत्त केले. एकमेकांना अडथळा देण्याचे काम विलासराव देशमुख यांच्या काळात कधी झाले नाही. जलसंपदा विभागाच्या कामांसाठी त्यांनी कधी आडकाठी आणली नाही. आरोप झाले यापेक्षाही काम किती झाले, याचे श्रेय अजित पवार यांच्याकडे जाते. टीका सर्वांवर होते. पण, लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली हे महत्त्वाचे आहे. सर्वांना न्याय देणे शक्य नसते. संधी नसतानाही शरद पवार, अजितदादांना साथ देणारे अनेक जण आहेत. आपला मुख्यमंत्री असेल तर सरकार चांगले चालते. पण, तीन पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेईपर्यंत वेळ लागला. काही निर्णय तर घेता आले नाहीत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. आम्ही भाषणात शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतो. पण, त्यांचे विचार युवकांमध्ये रुजविण्यासाठी कृती सक्षमपणे केली असते तर आजची वेळ आली नसती. तळागाळातील पीडितावर भविष्यात अन्याय होऊ शकतो, असा काळ आला आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading