Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुध्दा धोक्यात आला असल्याने, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी करत शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांकडे सुध्दा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या मुद्द्यात जून महिन्यापासून आज अखेर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतीचे मोठे नुकसान खरीपाचे संपूर्ण पीक गेले असून, रब्बी हंगामातील पेरणी केलेले पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून, घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी.

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनेक मागण्या तसेच राज्यातील समस्याबाबत चर्चा केली. यावेळी अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला विरोध करावा अशी मागणी पवार यांनी केली. तसेच पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने निधी द्यावा, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मार्गी लावावा, आशा सेविकांना किमान वेतन लागू करावे, राज्यातील विकास कामांवरील स्थगिती उठवावी, अहमदनगर येथील बर्डे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, उल्हास नदीवरील पूर नियंत्रण रेषा संदर्भांत सर्वसामान्यांना विचारात घ्यावे, विना अनुदानित शाळांचा प्रश्न सोडवावा आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींडून शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटीचे प्रकार थांबवावे आदी प्रश्न अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading