MCA साठी अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध; पटोले यांचा पवारांवर निशाणा
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युती केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेते नाराज झाले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकारणाचा वास येतोय असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ‘एमसीए निवडणूक म्हणजे पैशांची निवडणूक, एमसीएमध्ये खूप पैसा आहे. पण सध्या राजकारणात काय चाललंय ते कळत नाही, कुठलातरी वास येतोय असं वाटतंय. इथून मागे चार निवडणुका झाल्या पण त्या बिनविरोध झाल्या नाहीत. तर यावेळी काय चमत्कार झाला ते कळत नाही, एक नेता दुस-या नेत्याची भेट घेतो आणि युती करतो, त्यामुळे कुठेतरी राजकारणाचा वास येतोय’ अशा शब्दांत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधक हा भाजप असूनही शरद पवारांनी भाजपसोबत युती केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आत्तापर्यंत मौन धरले होते. नाना पटोले यांनी अखेर मौन सोडले असून शरद पवारांच्या या खेळीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका, कारण रमेश लटके यांचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आम्हीही उमेदवार दिला नव्हता त्यामुळे भाजपने उमेदवार देऊ नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपलेली नाही. एका वर्षासाठी निवडणुका नको असे म्हणत पवारांनी सर्वपक्षीय आवाहन केले आहे.
पटोले म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. जे परिवारवादाचे आरोप करतात ते स्वत: परिवारवादात अडकले आहेत. नुसते परिवारवादाचे आरोप लावून चालणार नाही. कृतीमध्ये नसणे हे चुकीचे आहे. ज्यांना लोकशाही पद्धत मान्य आहे, त्यांनी काँग्रेसची लोकशाही पद्धत अवलंबिली पाहिजे. दोन्ही काँग्रेसचे मातब्बर नेते उमेदवार आहेत. त्यांना संसदीय प्रणालीचा पूर्ण अभ्यास आहे. तसेच, पुढे बोलताना गांधी परिवारापुरताच पक्ष नाही तर देशाचा पक्ष आहे. ही मिस कॉल वाली पार्टी नाही. गांधी परिवाराला देशापेक्षा मोठे कोणी नाही.
