देशाचे भविष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे – डॉ. शां.ब. मुजुमदार
पुणे : “ शालेय शिक्षण हे अत्यंत महत्वाचे असते. कारण याच माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडत असते. त्यांच्यामधील कौशल्य, कला आणि नेतृत्वगुण विकसित होत असतात. यातून एक चांगला समाज आणि देशाचे भवितव्य घडते. त्यामुळेच चांगला समाज आणि देशाचे भवितव्य घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्वाचे असते,’’ असे मत सिम्बोयासीस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.
कन्नडा संघ, पुणे संचालित डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मुजुमदार बोलत होते. गणेशनगर, एरंडवणे येथील संस्थेच्या शकुंतला जग्गन्नाथ शेट्टी सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी, कन्नड संघ, पुणे’चे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्ष नारायण हेगडे, इंदिरा सालीयान, सचिव मालती कलमाडी, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी नाईक, ज्योती कडकोल आणि शिल्पा खेर उपस्थित होते.
डॉ. मुजुमदार म्हणाले, “ शिक्षण क्षेत्रात ५०-६० वर्षे व्यतीत केल्यानंतर मी विश्वासाने सांगू शकतो की, शिक्षक हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. समाज आणि देशाचे भविष्य घडविण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.’’
कुशल हेगडे यांनी कन्नड संघ, पुणे’चा शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा प्रवास अतिशय गौरवशाली राहिला असल्याचे सांगत या प्रवासात योगदान देणाऱ्या मान्यवरांचे अभिनंदन केले. तर मालती कलमाडी यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम याबाबत माहिती दिली. तसेच या ५१ वर्षांच्या प्रवासात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापक यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि गायन सादर केले.