NIA ने पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकल्याच्या निषेधार्थ पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार
पुणे : पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह ठिकाणी छापेमारी सुरू आहे. अशातच बीड, पुणे, मालेगाव येथून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चार जणांना नाशिकच्या एटीएस कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना थोड्याच वेळात नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने रात्री तीन वाजता नवी मुंबईतील नेरूळमधील पीएफआय च्या कार्यालयावर छापा मारला. तर पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मधून देखील एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर संवेदनशील समजले जाणाऱ्या मालेगाव मधून देखील सैफुर रहमान यास एटीएसने ताब्यात घेतले आहे.या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मोहमद शेख आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोंढवा भागात आम्ही जो हॉल कार्यक्रमा करिता घेत होतो. त्या मालकाला केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकार्यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धमकावले. त्याच दरम्यान माजी राज्य सरचिटणीस रझी खान आणि अब्दुल कय्युम शेख या दोघांना अधिकार्यांना ताब्यात घेतले.अब्दुल कय्युम शेख हे आयटीमध्ये काम करणारे,तर रझी खान हे बांधकाम व्यावसायिक आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी या दोघांना ताब्यात घेतल्याचे तपास यंत्रणा मार्फत सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रातील तपास यंत्रणेला हाताला धरून मुस्लिम समाजाला लक्ष करत आहे. आज अखेर जवळपास 20 जणांना ताब्यात घेतले गेले आहे. या अशा कारवाईमुळे संबधित व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबियाचे समाजात जगताना मुश्किल होते. तर एखाद्या ताब्यात घेतल्यावर जवळपास तीन वर्ष ते 10 वर्ष त्याची चौकशी सुरू असते. त्यामध्ये त्याच संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड येथील यशवंत शिंदे यांनी याचिका दाखल केले की देशभरात 2000 सालापासून झालेल्या बॉम्ब ब्लास्टच्या घटनांमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या याचिकेची दखल घेतली जात नाही.पण आम्ही सर्व समाजासाठी काम करत असताना आमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांना काही महिने शिल्लक राहिल्या आल्या की,मुस्लिम समाजातील संघटनांवर केंद्रातील भाजप सरकार याच तपास यंत्रणा मार्फत कारवाई करीत आहे