नोकऱ्या मुंबईत अन् मुलाखती चेन्नईत; शिंदे सरकारचा अजब कारभार
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रोजगार पळवल्याचे आरोप सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर करत आहेत. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-अंधेरी सी लिंक कामासंबंधीच्या मुलाखती या देखील चेन्नईमध्ये घेतल्या जात असल्याचा खुलासा आज शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच भूमीपुत्रांच काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यावे, अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या संमतीने महाराष्ट्राचं आर्थिक खच्चीकरण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आज (दी. 21) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, वांद्रे- अंधेरी सी लिंकचा प्रकल्प हा मुंबईमध्ये होणार आहे. पण त्यासाठी येत्या रविवारी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात येणार आहेत. वांद्रे- अंधेरी सी लिंकच्या कामासंबंधित मुलाखतीची ही जाहिरात ऑनलाइन आली आहे. त्यामुळे भूमीपुत्रांच्या हक्काचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. मला चेन्नई किंवा गुजरातवर आक्षेप नाही, पण काम जर मुंबईत असेल तर मग केवळ चेन्नईमध्ये मुलाखती का? त्याचसोबत मुंबई, ठाणे, संभाजीनगर या सारख्या शहरातही मुलाखती व्हाव्यात. मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं.
या सर्व प्रकारावरून असे वाटते की मुख्यमंत्री यांच्या समंतीने हे सर्वकाही सुरू आहे. किंवा त्यांना या गोष्टी माहीतच नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यावे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.