साखर क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी -शरद पवार
पुणे:आजपासून पुण्यात दोन दिवसांची वार्षिक साखर परिषद होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनतर्फे ही वार्षिक परिषद होत आहे. या परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. या कार्यक्रमाला डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित आहेत.
यावेळी शरद पवार म्हणाले,साखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा. साखर धंद्यात अधिक संशोधन व्हावे आणि त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. साखर उत्पादनातील संशोधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी. आतापर्यंत तशी तरतूद केलेली ऐकण्यात नाही. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी. अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
ऊसाचे उत्पादन वाढविताना दुसरीकडे पर्यावरणातील बदल आणि त्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रीय करायला हवे. कारण ते समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत आपण हवामानाचे बदल पाहत आहोत. एकीकडे साखर उत्पादन वाढविताना दुसरीकडे मातीची गुणवत्ता, जलसंवर्धन या गोष्टींवरही लक्ष द्यायला हवे. असे शरद पवार म्हणाले.
ब्राझील हा देश साखर उत्पादनात अग्रेसर असला आहे. तरी ते इथेना’ल वर जास्त लक्ष देतात.मी ब्राझिलच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्यांचे अधिक लक्ष हे साखरेपासून इथेना’ल अधिक कसे तयार करता येईल,यावर आहे. त्यासाठी ते काम करत आहेत. भारताने त्याबाबत विचार करावा. असे शरद पवार म्हणाले.
