वाट चुकलेल्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे वाचले पाहिजेत – संतोष शिंदे
पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांची लेखणी ही समतेची चळवळ जिवंत होती. शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी प्रबोधनकार नेहमी लढत राहिले. अनिष्ट रूढी, कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी व इतर समाजाला चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या गोष्टींना प्रबोनकरांचा तीव्र विरोध होता. त्यांच्या विचारांचा ज्वलंत इतिहास त्यांच्या लेखणीतून प्रकट होतो. म्हणून ‘वाट चुकलेल्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे वाचले पाहिजेत, असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड पुणे शहर शाखेच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती ‘लोक प्रबोधन दिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, जे प्रवाहाच्या विरुद्ध लढतात तेच यशस्वी होतात. मात्र जे लढताना साथ सोडतात ते गटांगळ्या खाऊन बुडतात. म्हणून नेहमी धोकेबाजंपासून सावधान राहायला पाहिजे. त्यासाठी चांगलं लिखाण, चांगली लोक आणि चांगले विचार हेच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. भांडवलदार राज्यकर्ते, धर्मपुरोहीत यांच्या अभद्र मगर मिठीतुन जनतेला मुक्त करावे लागणार आहे. तरच भारताचे संविधान व लोकशाही अबाधित राहणार आहे असे ही मत त्यांनी व्यक्त केले.
१९२१ च्या दरम्यान प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले.त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतुन महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख मिळाली. त्यामुळे संभाजी ब्रिगेड ने प्रबोधनकारांच्या विचाराला व इतरही गौत्तम बुद्ध ते जिजाऊ, शिवराय, फुले, शाहु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विचाराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर लोकप्रबोधन दिन म्हणुन साजरा करत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, कार्यक्रमाचे संयोजक व पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सचिव संदीप कारेकर, सोशल मीडिया’चे प्रमुख सचिन गायकवाड, महादेव मातेरे, अविनाश घोडके, नरेश पडवळ, तुषार गोगावले, आदित्य पायगुडे, दत्ता गोगावले, व्यकंटश मानंपिडी, समाधान घोडके, रंजीत लंगर, वैभव घोडके, तेजस लिमन, मानसिंग राजपूत संजय माने, राम परेश कुमार, उमेश कुमार, कुणाल चांदूरकर आदी उपस्थित होते.
