तृतीपंथीयांचे परिषदेतील ठराव सर्वांसमोर मांडणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे, : मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेतील ठरावाचे मुद्दे लोकप्रतिनिधी, समाज कल्याण विभाग, सर्व विभागांचे अधिकारी, माध्यमे, शिक्षणसंस्था यांना सादर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी परिषदेच्या समारोपादरम्यान दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभगृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात ‘तृतीयपंथीयांचा आरोग्य आणि निवारा’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.
समारोपाच्या सत्रात ‘तृतीयपंथीयांविषयी आम्ही काय करणार?’ या विषयावर मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उल्हास पवार, मनीषा कायंदे, रेखा ठाकूर, रणजित शिरोळे, लता भिसे सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी तृतीयपंथी व्यक्तींनी त्यांच्या अडचणी पदाधिकऱ्यांसमोर मांडल्या. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुढील काळात तृतीयपंथी व्यक्तींसाठी करण्यात येणाऱ्या कामांबाबत भूमिका मांडली.
महिला आयोगाच्या पाठपुराव्याने ससूनमध्ये राज्यातला पाहिला तृतीयपंथी व्यक्तींचा २५ खाटांचा विभाग तयार होत असल्याची माहिती यावेळी श्रीमती चाकणकर यांनी दिली.
देशपांडे म्हणाले, या निमित्ताने आम्ही एका मोठ्या कुटुंबाशी जोडलो गेलो आहोत. येथे उपस्थित तृतीयपंथी हे मतदार नोंदणीच्या कामात त्या जिल्ह्यासाठी दूत म्हणून काम पाहतील.
