आम्हाला तृतीयपंथी म्हणून नाही तर माणूस म्हणून स्वीकारा..!!
मुख्य निवडणूक अधिकारी व विद्यापीठाकडून आयोजित ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ परिषदेतील सूर
पुणे:अन्य व्यक्तीप्रमाणे आमचीही ओळख ही आमच्या कामाने, आमच्या शिक्षणाने, आमच्या कौशल्याने व्हायला हवी मात्र ती आमच्या लिंगाने होताना दिसते. त्यामुळेच आम्हाला तृतीयपंथी म्हणून देखील नाही तर माणूस म्हणून स्वीकारण्याची गरज आहे असा सूर तृतीपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या राज्यस्तरीय परिषदेतून उमटला..
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘एलजीबीटीआयक्यू प्लस ‘अर्थ आणि फरक या विषयावर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात करिअरमध्ये यशस्वी झालेल्या तृतीपंथीयांचा संवाद, तर तिसऱ्या सत्रात तृतीयपंथीयांचे शिक्षण आणि रोजगार या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कौशल्य विद्यापीठाच्या डॉ.अपूर्वा पालकर, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे डॉ.निपुण विनायक, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, एमटीडीसीचे संचालक राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रेक्षकांमध्ये बसत जिल्हाधिकारी राजेश देशमुख व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी शिक्षण आणि रोजगारात भविष्यात कोणत्या गोष्टी करता येतील यावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेही अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी तृतीपंथीयांच्या कवितांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला.
तृतीपंथी व्यक्तींनी परिषदेत मांडलेले मुद्दे
१) आमच्या निवारा, शिक्षण, रोजगार, मूलभूत प्रश्नांवर काम होणे गरजेचे
२) लहानपणापासूनच मुलांच्या पाठ्यपुस्तकात या विषयावर जनजागृती आवश्यक
३) जन्माच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रे मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात
४) आमच्यातील प्रत्येकाच्या कौशल्यानुसार त्यांना प्रशिक्षण मिळावे
५ तृतीपंथीयांचे विद्यापीठात अध्यासन असावे
६ आम्हालाही लोकसभेत स्थान असावे
७ प्रत्येक जिल्ह्याला तृतीपंथी संरक्षण केंद्र असावे.