‘बोट दाखवेल तेथे बोट’सेवा सुरू झालीच पाहीजे; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
पुणे: तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी तळी साठल्यासारखी परिस्थिती झाली आहे. सध्या पुणे मनपात प्रशासकराज सुरू आहे. त्यापूर्वी भाजपचा महापौर पालिकेवर होता. शहरात पावसामुळे जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साठलंय. भाजप सत्तेत असताना त्यांनी पुणेकरांची दुर्दशा केली. असा आरोप आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज करण्यात आला. भाजपच्या कारभाराचा निषेध करत पुणे महापालिकेच्या इमारतीसमोर राष्ट्रवादीकडून पाण्यात बोट सोडत अनोखे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, संतोष नागरे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले,यावर्षीच्या पावसाळ्यात अगोदरच खड्डेमय असणारे पुणे शहर आता जलमय झालं आहे. पावसामुळे जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठले. अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले. लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं. ड्रेनेज लाईन तुटलेल्या होत्या. अनेक ठिकाणी तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप झाले होते. एकंदरीत पुणेकरांची कालच्या पावसाने दाणादाण उडविली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहर स्मार्ट करण्याची घोषणा केली होती. परंतु पुण्यातील भाजपाच्या कारभाऱ्यांनी मात्र पुणे आणि पुणेकरांची दुर्दशा केली आहे. गेली पाच वर्षे मनपातील कारभार तर देशाच्या पंतप्रधांनानी दिलेल्या वचनाला हरताळ फासणारा होता. पुणेकरांची स्मार्ट सिटी भाजपाने पाण्यात बुडवून टाकली. याचा तसेच देशाच्या पंतप्रधानांचा शब्द खोटा ठरविल्याबद्दल भाजपने उत्तर दिले पाहिजे.
म्हणून आज आम्ही पाण्यात बोटी सोडून आज आंदोलन करत आहोत असे प्रशांत जगताप म्हणाले.
