आदिवासी विकास ऐवजी आदिवासी भकास मंत्रालय शिंदे सरकार चालवत आहे का ? डॉ. नीलम गोर्हे यांचा सवाल
पुणे : जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेचा अत्यंत भीषण असा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेपूर्वी सादर महिलेवर चार जणांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सदर महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र हा मृत्यू संशयास्पद आहे. असे असतांनाही पोलिसांनी मात्र ही केवळ आत्महत्या असल्याची केस दाखल केली. म्हणून केवळ त्याच दिशेने तिचे शव विच्छेदन करण्यात आले. तिच्या पालकांनी मात्र तिचे शवविच्छेदन पुन्हा एकदा व्यवस्थित रीत्या व्हावे या मागणीसाठी तिचा मृतदेह घरातच मीठाच्या खड्ड्यात पुरून ठेवलेला आहे. याबाबत संपूर्णपणे बेकायदेशीर माहिती पोलिस आणि आरोग्य विभाग देत आहे. शवविच्छेदन करताना महिलांच्या बाबतीत तर त्यांच्या गोपनीय भागातही काही जखमा अथवा पुरावे आहेत का याची तपासणी केली जात असते. आरोपी आणि त्या महिलेचे डी एन ए तपासून त्याबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. आता पुन्हा एकदा शवविच्छेदन होत आहे अशी माहिती समोर येत आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकार्यानी याबाबत संपूर्णपणे माहिती घेऊन काळजीपूर्वक ही घटना हाताळणे आवश्यक आहे. धडगाव तालुक्यातील आरोग्य अधिकार्यानी आणि पोलिसांनीही ही काळजी घेतली नाही. या ठिकाणच्या आरोग्य अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे. गेल्या दीड महिन्यापासून या घटनेवर कोणीच काही पावले उचलली नाहीत. नंदुरबारचे पोलिस महानिरीक्षक, अधीक्षक, पोलिस पाटील, संबंधित पोलिस स्टेशांचे अधिकारी कर्मचारी या सर्वांची याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे.
आदिवासी समाजाची फरफट होत असून आदिवासी समाजाबाबत सातत्याने काही ना काही दुर्घटना घडत आहेत. याविषयी स्थानिक खासदार, आमदार यांनी काहीच पावले का उचलली नाहीत हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. आदिवासी विकास ऐवजी हे आदिवासी भकास मंत्रालय राज्य सरकार चालवत आहे असा सवाल विधानसभेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारला पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला आहे.
