भाजपच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाहीत -विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
पुणे : शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेच्या सभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची पुण्यातल्या घरी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. या पत्रकार परिषदेला विधानपरिषदेच्या सभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर निलम गोऱ्हे, शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले, मागच्या महिन्यात उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला केला.असा आरोप शिवसैनिकांवर करण्यात आला होता. काही पुरावे नसताना रात्री गुन्हे दाखल केले होते. मात्र अशा दडपशाहीला आम्ही घाबरत नाहीत.
अंबादास दानवे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना अनेक निर्णयांचा पाठपुरावा केला. मात्र, राज्यपालांनी तत्परता दाखवली नाही. आता शिंदे-फडणवीसांच्या काळात प्रलंबित १२ आमदारांच्या यादीवर निर्णय लवकर होणार आहे. यावरून राज्यपालांची तत्परता दिसून येते, असा टोला दानवेंनी भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे.
दसरा मेळावा शिंदे गट का शिवसेना करणार याचा वाद अजून सुरू आहे याचा वाद कोर्टात गेला आहे. त्यावर अंबादास दानवे म्हणाले , शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असे दानवेंनी ठामपणे सांगितले. शिवसेनेने आतापर्यंत काही परवानग्याच घेतल्या असे नाही. आम्ही परवानगी नाकारली तर जनतेच्या दरबारात जाऊ. आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यावर अंबादास दानवे म्हणाले,12 सप्टेंबरला मुख्यमंत्री पैठणला जात आहेत. बघा काय होते ते. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप यांच्या संभाव्य युती संदर्भात दानवे म्हणाले, ज्या राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ’ दाखवून कोणाला टार्गेट केले. ते नेमकी आता काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष असेल.
निलम गोऱ्हे म्हणाल्या, अंबादास दानवे झंझावातासारखे काम करत आहेत. राजधर्म पाळा, असे नरेंद्र मोदींना अटलजींनी सांगितले होते. मोदींना जबाबदारी तशीच ठेवा, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र एवढ्या लवकर तुम्ही इतिहास विसरलात, अशी खंत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दानवेंचे कौतुक केले तर भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, की आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही. जनतेच्या दरबारात जे काय होईल ते होईल.