देशाच्या प्रगतीसाठी बौद्धिक व शारिरीक संपन्नता गरजेची : डॉ. मनीष कुलकर्णी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये ‘देशभक्तांच्या प्रेरणादायी पुस्तकांची हंडी’ उत्साहात साजरी
पुणे : ‘देशाच्या प्रगतीसाठी बौद्धिक व शारिरीक संपन्नता गरजेची आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी देशभक्तांचे चरित्र वाचनासोबतच त्यांच्या अंगी असलेला सहनशक्ती व संयम हा गुणही अंगीकारला पाहिजे.’ असे जेष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ व शल्य विशारद डॉ. मनीष कुलकर्णी म्हणाले.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे शाळेत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ता सोबतच ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे’ औचित्य साधत ‘देशभक्तांच्या प्रेरणादायी पुस्तकांची हंडी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, बोधपर, साहस व राष्ट्रप्रेम जागवणा-या देशभक्त तसेच राष्ट्रपुरुषांच्या चरित्रात्मक गोष्टींची मराठी, हिंदी व इंग्रज भाषेतील पुस्तके डाॅ. कुलकर्णी यांच्या हस्ते भेट देण्यात आली. याप्रसंगी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, प्राची मोडक, मंजुषा मदगुणकी, मंजिरी कोल्हे, मयुरी बारणे, ऐश्वर्या नायडू, उत्तम साळवे, डॅनियल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
‘देशभक्तांच्या प्रेरणादायी पुस्तकांची हंडी’ या उपक्रमाची संकल्पना प्रसाद भडसावळे यांची होती. यानिमित्ताने देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांचा परिचय करुन देणा-या ३०० हून अधिक विविध शीर्षकांची हजार पुस्तके विद्यार्थी, शिक्षकांना देण्यात आली. भेट मिळालेल्या या पुस्तकावर आधारित देशभक्तांच्या कथांचे सादरीकरण, लेखन, चित्रफित, प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम विद्यार्थी गणेशोत्सवात सादर करणार असल्याचे, प्रसाद भडसावळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी कोल्हे यांनी केले.