राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात करण्यात आल्या आहेत. तर नांदेड- १, गडचिरोली- १ अशी एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज दिलेल्या माहिती अहवाला नुसार ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
