Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणे आवश्यक: दिलीप वळसे – पाटील

पुणे: पुणे जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. विशेषतः अजित पवार यांच्या दूरदृष्टीने व कल्पक नेतृत्वाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यशाच्या शिखरावर वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी असून यामधून राज्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, दिपक मानकर, अभिनेते महेश कुलकर्णी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख अधिष्ठाता डॅा. विजय खरे, अधिष्ठाता डॅा. दिपक माने, अधिष्ठाता डॅा. मनोहर चासकर बाबुराव चांदेरे, सुनिल चांदेरे, सुनिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर या सायकल स्पर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे असे नमूद करत पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.

आपल्या मनोगतामध्ये रोहित पवार यांनी कोविड महामारीच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली सात वर्षे सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. तसेच युवा वर्गाला आपले नैपुण्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे असे नमूद करत अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळते, असे स्पष्ट केले.

सदर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अमृता खराडे, नितीन लगड तर आभार प्रदर्शन अॅड. मोहनराव देशमुख यांनी केले.
या उद्घाटन समारंभाच्या यशस्वितेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading