वनराईच्या पर्यावरण जागृती – कृती प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद..
पुणे : पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेचा ३६ वा वर्धापनदिन नुकताच संपन्न झाला. यानिमित्ताने आयोजित केलेल्या “ग्रामीण-पर्यावरणपूरक जीवनशैली” या पर्यावरण जागृती – कृती प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिभूषण आदिवासी शेतकरी गंगाराम धोंडू धिंदळे व स्वच्छ्तादूत नीता अतीश देवकुळे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना पंडित मनीषा साठे, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
गंगाराम धिंदळे यांनी आदिवासी भागातील पारंपरिक दुर्मिळ बि – बीयाणे, वानांचे संवर्धन व पूर्नलागवड केली आहे. तर स्वच्छ्तादूत नीता देवकुळे या ‘काच, कागद, पत्रा कष्टकरी संघटना/ स्वच्छ संस्था पुणे’ मध्ये स्वच्छतासेवक म्हणून काम करत आहेत.
या पर्यावरण जागृती – कृषी प्रदर्शनात पारंपरिक दुर्मिळ बी – बियाणे, औषधी वनस्पती, दैनंदिन गृहपयोगी पर्यावरण पूरक उत्पादने, शहर शेतीसाठी बाल्कनी व घराच्या छतावरील लागवडीसाठी रोपे, बांबू उत्पादने,काचेच्या तुटलेल्या बांगड्यांपासून हस्तकलेतून साकारलेले शो पीस, बायोमास स्टो, ग्रीन हिल ग्रुपचे निसर्गचित्र, पेंटिंग, पोस्टर प्रदर्शन, भूजल पुर्नभरण उपाय योजना प्रतिकृती, भूजल सर्वेक्षण उपकरण, पिण्याच्या पाण्याचे गुणवत्ता तपासणी किट, तसेच वनराई मासिक व संस्थेची प्रकाशने उपलब्ध होते.
यावेळी पुण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदर्शनाला भेट दिली. याचबरोबर सामाजिक, राजकीय, कृषी, पत्रकारिता, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण प्रदर्शन आणि स्नेहमेळाव्याला आवर्जून हजेरी लावली. पुणे, सातारा, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जालना अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील गावागावांतील कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी वनराई कार्यालय परिसरात एकच गर्दी केली होती.
देशातील पडीक जमिनी उत्पादनक्षम व्हाव्यात आणि देशाच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी याकरिता वनराईच्या माध्यमातून शेतकर्यांना आजवर २ कोटीहून अधिक बिया व रोपांचे वाटप केले, तसेच जल-मृद संवर्धनासाठी वनराई बंधा-याची चळवळ उभारली. पाणलोट व्यवस्थापनाबरोबरच चराईबंदी, कु-हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसुत्री’ कार्यक्रम राबवला. ग्रामीण भागात १३ प्रशिक्षण केंद्र उभारुन शेतक-यापर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविले. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकसहभागातून स्वच्छ, हरित, संपन्न व जलसमृद्ध गावांची निर्मिती केली. यातूनच शाश्वत ग्राम विकासाची गंगा गावागावात वाहू लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा अशा विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्यागावांमध्ये शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे‘शहरातून खेड्याकडे’ (Reverse Migration) घडवून आणण्यात वनराईने यश मिळवले. वनराईचे उपक्रम स्थानिक ग्रामस्थांचे गरज लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविले जातात. या सर्व उपक्रामांचा आढावा ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त पहावयास मिळाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.